शेतकऱ्यांची कनेक्शन तोडल्याने आक्रमक झालेल्या सुहास बाबर यांचा महावितरणला इशारा
प्रतिनिधी / विटा
महावितरण कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता गावोगावी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडली आहेत. आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर हा मोठा अन्याय आहे. शेतकऱ्यांना पंधरा दिवसांची मुदत द्यावी, अन्यथा महावितरणचे कार्यालय फोडू, असा इशारा जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिला आहे.
महावितरण कंपनीने थकीत विजबिलापोटी गावोगावी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडली आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी आक्रमक भूमिका घेत महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला आहे. महावितरण कंपनीने वीज कनेक्शन तोडण्यापूर्वी शेतकऱ्यांना किमान पंधरा दिवसाची मुदत द्यावी, अशी मागणी करीत पूर्वसूचना न देता वीज कनेक्शन तोडल्यास महावितरण चे कार्यालय फोडू असा इशारा बाबर यांनी दिला आहे.
बाबर म्हणाले, एका बाजूला कोरोनाचा कहर वाढत असल्याने शासन आणि प्रशासन नागरिकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन करीत आहे. मात्र त्याचवेळी महावितरण कंपनीकडून थकीत वीज बिलासाठी शेतकऱ्यांना कसलीही पूर्वसूचना न देता कनेक्शन तोडण्यात आली आहेत.
राज्यातील जनता अगोदरच कोरोनाच्या संसर्गजन्य साथीने हैराण आहे. अशात महावितरणच्या धोरणाने लोकांच्यात संताप निर्माण झाला आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. महामारीमुळे शेतीपूरक उद्योग व्यवसायावर संकट आले आहे. अशा परिस्थितीत वीज बिल माफ होणे अथवा त्यामध्ये सवलत मिळणे अपेक्षित होते. परंतु याउलट कसलीही पुर्व सुचना न देता कनेक्शन कट करणे, ही बाब अत्यंत चुकीची आहे. याबाबत शेतकऱ्यांना पंधरा दिवसांची मुदतवाढ देऊन त्यामध्ये हप्ते पाडून द्यावेत आणि ज्यांची कनेक्शन तोडली आहेत, त्यांनाही बील भरण्यासाठी पंधरा दिवसाचा अवधी मिळावा. त्यासाठी त्यांची तोडलेली कनेक्शन पूर्ववत जोडुन मिळावीत. अन्यथा पंधरा दिवसांनी महावितरणच्या कार्यालयावर हल्लाबोल करू कार्यालय फोडू, असा इशाराही बाबर यांनी दिला आहे