विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांची टीका
प्रतिनिधी/ मडगांव
गोव्यातील वीज ग्राहकांच्या दोन महिन्यांच्या बिलांतील निश्चित शुल्कात दिलेली 50 टक्के सवलत निष्काळजीपणे घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे कोविड संकट व आर्थिक मंदीच्या संकटात सापडलेल्या लोकांना कोणताच दिलासा मिळणार नाही. मुख्यमंत्र्यानी काँग्रेस पक्षाने वीज बिलांच्या रकमेत 50 टक्के सुट देण्याची केलेली मागणी मुख्यमंत्र्यानी मान्य करावी असे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.
काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी निरंतर पणे संपुर्ण गोव्यात वाढीव वीज बिलांचा विषय घेऊन निदर्शने केली. काल समाजमाध्यमांवर ’स्पिक अप फॉर गोवा’ ही मोहीम राबवुन हजारो लोकांचे वीज बिले माफ करण्याची मागणी सरकारकडे पोचवली. काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांचे आपण अभिनंदन करतो व सरकार आम्हाला परत आंदोलन करण्यास भाग पाडणार नाही अशी आशा बाळगतो असे श्री. कामत यांनी म्हटले आहे.
सरकारने लोकांप्रती संवेदनशीलता दाखवुन त्यांना दिलासा देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. कोविड संकट व आर्थिक मंदीत लोक दबले गेले आहेत हे सरकारने लक्षात ठेवावे असे ही श्री. कामत यांनी म्हटले आहे.