प्रतिनिधी/ फोंडा
ऐन दिवाळीच्या तोंडावर वीज बिलांवर दर युनिटमागे 30 पैसे एफपीपीसीए वाढवून सरकारने जनतेला शॉक दिला आहे. वाढती महागाई व कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटली असून अशा परिस्थितीत सामान्य जनतेवर लादलेला हा अतिरिक्त बोजा आहे. वाढीव वीज बिलांवरील ही रक्कम सरकारने फेडावी अशी मागणी गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी केली आहे.
राज्यातील भाजपा सरकार हे अंत्योदय म्हणजे गरीबांचे आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सांगतात. ही निव्वळ घोषणा व फसवणूक असून प्रत्यक्षात या सरकारला कष्टकरी लोक व सर्वसामान्य जनतेचे काहीच पडलेले नाही, अशी टिकाही कामत यांनी फोंडा येथे पत्रकार परिषदेत बोलताना केली. कॉरोनोच्या काळात यापूर्वीच वीज दर वाढविण्यात आले होते. त्यात आता एपीसीसीए वाढवून आणखी एक शॉक दिलेला आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अनेकांना नोकऱया गमवाव्या लागल्या. काही लोक अजूनही अर्ध पगारी काम करीत आहेत. व्यावसाय धंदे नापुरतेच सुरु असल्याने लोकांना बँकांचे हप्ते फेडण्यासाठी नाईलाजाने आपली वाहने व फ्लॅट विकावे लागले आहेत. या बिकट परिस्थितीत जनतेला आधार देण्याची सरकारची जबाबदारी असताना उलट वीज, पाण्यावरील बिलांचे शुल्क वाढविले जातात. अनेक सरकारी खात्यामध्ये शुल्कवाढ करण्यात आली आहे. वीज व पाण्याच्या वाढीव बिलांचा फटका थेट सामान्य नागरिकांना बसणार आहे, असे सांगून सरकारच्या या कृतीचा त्यांनी निषेध केला. वेळ पडल्यास वीज खात्याच्या प्रधान मुख्य अभियंत्यांना घेराव घालण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.