ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्यात भरमसाठ पाठविण्यात आलेल्या वीजबिलाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिक आक्रमक झाली आहे. हा प्रश्न त्वरीत सोडविण्यात यावा, अशी मागणी मनसेनेने केली आहे. याबाबत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहीले आहे.
या पत्रात राज ठाकरे यांनी अवाच्यासव्वा वीज बील आकारणीला तात्काळ चाप बसायलाच हवा. वीजबिलात तात्काळ सूट द्या, अशी मागणी केली आहे.
कोरोनाच्या या लढाईत बहुदा राज्य सरकारचे एका महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष तरी होते आहे. या विषयातील जनतेच्या तीव्र भावना त्यांच्यापर्यंत पोहोचत नसाव्यात आणि म्हणूनच या विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरकारचे लक्ष वेधून घेऊ इच्छिते.
वीज कंपन्यांकडून अवाजवी बिले पाठविण्यात आली आहेत. ही बिले रद्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे . मार्च, एप्रिल, मे ह्या तीन महिन्यांची सरासरी वीज बिलं पाठवल्यानंतर त्या तीन महिन्यांत विजेचा झालेला वापर आणि सरासरी विजेची बिलं यांच्यातील तफावत जून-जुलै महिन्यात ग्राहकांच्या माथी मारण्यात येत आहे. तफावतीच्या नावाखाली बिलांच्या ज्या रक्कमा आकारल्या गेल्या आहेत त्यावरून त्याला तफावत न म्हणता लूटच म्हणावं लागेले, असा आरोप राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे.