राजन नाईक यांचे पालकमंत्र्यांना निवेदन
..तोपर्यंत वीज पुरवठा खंडित करू नये!
वार्ताहर / कुडाळ:
कोरोना महामारीच्या या कालावधीत वीज ग्राहकांची बिले भरमसाठ आली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिलांमधील सर्व आकार रद्द करावेत. शासनाचा आदेश येईपर्यंत बिले भरण्याची सक्ती ग्राहकांना करू नये. तसेच त्यांचा वीज पुरवठा बंद करू नये, असे निर्देश महावितरण कंपनीला द्यावेत, अशी मागणी शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ऑनलाईन बिल भरणा करणाऱया ग्राहकांनाही दोन टक्के सवलत मिळावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
कोरोनाचे संकट ओढवल्यानंतर सर्व उद्योग-व्यवसाय तसेच व्यवहार बंद झाले. रोजगाराचीही मोठी समस्या निर्माण झाली. सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले. या चार महिन्यांच्या कालावधीतील वीज देयके वाढीव आली आहेत. ही देयके भरणे सर्वसामान्य ग्राहकांना कठीण झाले आहे.
बिले भरण्याची सक्ती नको
महावितरणच्या नियमानुसार काढण्यात आलेली ही देयके भरमसाठ आहेत. दर महिन्याला शंभर युनिटप्रमाणे गेल्या चार महिन्यांच्या युनिटचा दर स्थिर ठेवावा. देयकावरील स्थिर आकार, इंधन आकार व इतर सर्व आकार वगळून देयके कमी करावीत. शासनाचा तसा आदेश होईपर्यंत ग्राहकांना बिले भरण्याची सक्ती करू नये. तसेच त्याचा वीज पुरवठा खंडित करू नये, असे निर्देश वीज वितरणला द्यावेत.
‘ऑनलाईन’ ग्राहकांनाही सवलत मिळावी ऑफलाईन देयक भरल्यानंतर ग्राहकाला दोन टक्के सवलत मिळते. परंतु ऑनलाईन भरणा केल्यास ती सवलत मिळत नाही. ऑनलाईन बिल भरणाऱया ग्राहकांना ही सवलत मिळावी, अशीही मागणी नाईक यांनी केली आहे. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व वीज वितरण अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनाही निवेदन दिल्याचे नाईक यांनी सांगितले.