कराड/प्रतिनिधी
जम्मू–काश्मिर येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत वीरमरण आलेल्या शहीद संदीप रघुनाथ सावंत यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बंधू सागर सावंत यांनी त्यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. यावेळी हजारो कराडवासीय उपस्थित होते.
शहीद संदीप सावंत यांचे पार्थिव आज सकाळी कराड येथे आणण्यात आले. कराडच्या विजय दिवस चौकातून अंत्ययात्रेला सुरूवात झाली. युवक–युवतींसह लाखोंचा जनसमुदाय अंत्ययात्रेत सहभागी झाला होता. संदीपदादा अमर रहे…वीरजवान तुझे सलाम…च्या घोषणांनी कराड ते मुंढे रोडवरील प्रत्येक रस्ता दणाणून गेला होता. मुंढे गावातील रस्त्यावर शहीद संदीप सावंत यांचे फलक लावण्यात आले होते तर रस्ता रांगोळी आणि फुलांनी सजवला होता. रस्त्याच्या दुतर्फा महिला, मुली, शालेय विद्यार्थी हातात फुले घेऊन अंत्यदर्शनासाठी थांबले होते.
शहीद संदीप यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी कुटूंबियांचा आक्रोश मन हेलावणारा होता. त्यानंतर पार्थिक मुंढे येथे सावंत यांच्या शेतात नेण्यात आले. तिथे शासकीय इतमामात संदीप यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, कॅबिनेट मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभुराज देसाई, आमदार आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा पोलीसप्रमुख तेजस्वी सातपुते यांच्यासह सैन्यदलातील अधिकारी, मान्यवर उपस्थित होते.