खांब बसवून दोन वर्षे उलटली तरीही कानाडोळा
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटी साकारण्यासाठी वीरभद्रनगर रोडवर बिनदिव्याचे खांब बसविले आहेत. खांब बसवून दोन वर्षे उलटली. पण दिवे बसविण्याचा विसर स्मार्ट सिटी कंपनीचे अधिकारी व कंत्राटदाराला पडला आहे. त्यामुळे दिवे बसविणार की नाही? अशी विचारणा नागरिक करीत आहेत.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून दुभाजक आणि फुटपाथ निर्माण केले आहेत. एसपी ऑफिस ते धर्मनाथ चौकापर्यंतच्या विरभद्रनगर रोडच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण होवून दोन वर्षे उलटली. पण अद्यापही डेकोरेटिव्ह दिवे बसविण्याचे काम रखडले आहे. दुभाजक बांधताना डेकोरेटिव्ह दिव्यांसाठी पाया घालून विद्युतवाहिनी घालून ठेवली आहे. पण हे दिवे अद्यापही बसविले नाहीत. त्यामुळे या ठिकाणी सोडण्यात आलेल्या विद्युतवाहिन्या खराब झाल्या आहेत. त्यामुळे या खांबांवर दिवे बसविण्याचा विसर कंत्राटदार व अधिकाऱयांना पडला आहे का? अशी विचारणा नागरिक करीत आहेत.
अधिकाऱयांना लक्ष देण्याची गरज
शहरातील विविध भागात रस्त्याचा विकास करण्यात येत आहे. पण बहुतांश ठिकाणची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. अर्धवट स्थितीत असलेल्या कामाची पूर्तता करण्याकडे अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले आहे. सदर कामे पूर्ण झाल्याचे दाखवून बिले काढण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे ही कामे अर्धवट राहणार का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. वरि÷ अधिकाऱयांनी याकडे लक्ष देवून वीरभद्रनगर रस्त्यावर दिवे बसविण्यासाठी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.