पर्यावरणाची सुरक्षितता हा सध्याच्या काळातील कळीचा मुद्दा आहे. पर्यावरण सुस्थिर आणि स्वच्छ राखायचे असेल तर वृक्ष संवर्धन केल्याखेरीज पर्याय नाही. पर्यावरण आणि मानव यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणजे वृक्ष आहे, असे अनेक संशोधकांनी सांगून ठेवले आहे. वृक्ष जितका मोठा आणि विस्तृत तितका तो पर्यावरणासाठी अधिक उपयुक्त असतो. त्यामुळे मोठय़ा वृक्षांचे जतन करणे हे महत्त्वाचे कार्य पर्यावरण सुरक्षिततेच्या दृष्टीने मानण्यात येते.
काही दशकांपूर्वी हमालय परिसरात वृक्षतोडीविरुद्ध मोठे आंदोलन करण्यात आले होते. त्याला चिपको आंदोलन असे म्हणत असत. आंदोलनकर्ते वृक्षांना मिठय़ा मारून त्यांना तोडले जाण्यापासून वाचवत असत. याच आंदोलनाची वेगळय़ा प्रकारे पुनरावृत्ती नोयडा येथील मास्तर महकार नागर यांनी अनेक वर्षांपासून चालविली आहे. त्यांना याकामी इतर वृक्षप्रेमींचे साहाय्य लाभत आहे. तसेच सरकारनेही काही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
नागर हे वृक्ष लागवडीसाठी तसेच जुन्या वृक्षांना तोडले जाण्यापासून वाचविण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील वृक्षांची सूची बनविली असून या वृक्षांच्या आसपास राहणाऱया नागरिकांना त्याची कल्पना दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत हे वृक्ष तोडले जाऊ नयेत याची दक्षता हे नागरिक शक्य तितक्या प्रमाणात घेतात. तसेच आपल्या मुलांचे वाढदिवस किंवा जीवनातील महत्त्वाचे प्रसंग वृक्षारोपण करून साजरे करावेत, असे अभियान त्यांनी चालविले आहे. या अभियानाला मोठय़ा प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून सर्वसामान्य जनतेत वृक्षसंवर्धन जागृती करण्याचे महत्त्वाचे कार्य ते करीत आहेत. रिकाम्या जागांमध्ये झाडे लावल्याने त्यांची तोड होण्याचे प्रमाण कमी आहे.