कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर लाभार्थी शेतकऱ्यांच्या बांधावर व शेत जमिनीवर वृक्ष लागवड व फळबाग लागवड कार्यक्रमास 31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यास राज्य सरकारच्या नियोजन विभागाने (रोहयो) मंजूरी दिली आहे. याचा लाभ राज्यातील हजारो शेतकऱ्यांना हाणार आहे. ही माहिती आमदार चंद्रकांत जाधव यांनी दिली.
यावर्षी अतिवृष्टी, कलमी रोपांची अनुपलब्धता, शेतकऱ्यांचे फळबाग लागवडीचे प्रस्ताव ऑनलाईन करण्यास झालेला विलंब,ऑनलाईन करणे प्रलंबित असणे आणि चांगला पाऊस झाल्याने मार्चपर्यंत फळबाग लागवडीसाठी असलेले अनुकूल वातावरण इत्यादी कारणांमुळे वैयक्तिक लाभार्थ्यांच्या बांधावर व शेतात वृक्ष लागवड कार्यक्रमास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी 17 नोव्हेंबर रोजी पत्राद्वारे केली होती. खासदार प्रा. संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनीही पत्राद्वारे या संदर्भात पाठपुरावा केला होता.
कोविड- 19 च्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात रोजगार मिळण्यास निर्माण होणाऱ्या अडचणी आणि यावर्षी राज्यात वृक्ष लागवड व फळबाग लागवडीसाठी असलेले अनुकूल वातावरण तसेच, लोकप्रतिनिधींकडून होणारी मागणी विचारात घेऊन, नियोजन विभागाने (रोहयो) मनरेगा अंतर्गत शेतकऱ्यांच्या बांधावर व शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवर वृक्ष लागवड कार्यक्रमास 31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या निर्णयाचा लाभ जिह्यातील शेतकऱ्यांसह राज्यभरातील शेतकऱयांना होणार आहे, असे आमदार चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.