सध्याच्या बिकट परिस्थितीत साहाय्याचा हात देण्याची मागणी
@ नवी दिल्ली / प्रतिनिधी
भारतीय वृत्तपत्र संघटनेने (आयएनएस) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना काही महत्वाच्या मागण्यांचे पत्र पाठविले आहे. सध्या वृत्तपत्र व्यवसायाची वाटचाल अत्यंत कष्टप्रद परिस्थितीत चालली आहे. वृत्तपत्राच्या उत्पादनाचा खर्च प्रचंड प्रमाणात वाढला असून आर्थिक मंदीमुळे जाहिराती पुरेशा प्रमाणात मिळणे अशक्य झाले आहे. अशा स्थितीत या व्यवसायाला करसवलती आणि इतर साहाय्याचा हात द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
सध्या या व्यवसायाला कोरोना साथ, अपुऱया जाहिराती आणि वृत्तकागदावरील आयातशुल्क अशा तीन संकटांचा सामना एकाच वेळी करावा लागत आहे. सरकारने ही अडचण ओळखून वृत्तकागदावरील आयतशुल्क पूर्णतः रद्द करावे, अशी मागणी काही दिवसांपूर्वीच या संघटनेने केली होती.
आता या पत्राद्वारे काही नव्या मागण्या करण्यात आल्या आहेत. सरकारी जाहिरातींच्या दरात 50 टक्के वाढ करावी, वृत्तपत्र व्यवसायासाठी अर्थसंकल्पात असणाऱया तरतुदीमध्ये 100 टक्के वाढ करावी, सरकारी जाहिरातींची थकबाकी त्वरित फेडली जावी आणि राज्य सरकारांनाही थकबाकी त्वरित फेडण्याची सूचना केली जावी, अशा या मागण्या आहेत.