गौरी आवळे / सातारा :
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. यातच जेष्ठ नागरिकांना लस घेणे बंधनकारक आहे. तरीही वृद्धाश्रमातील जेष्ठांना अद्याप लस मिळाली नाही. लस घ्यायची असल्यास लसीकरण केंद्रावर यावे लागेल, अशी अट आरोग्य विभागाने घातली आहे. परंतु वृद्धाश्रमातील अनेकांना आधाराशिवाय चालता येत नाही. प्रवासात अडचणी येत आहेत. यामुळे हे जेष्ठ लसीकरणापासून अद्याप वंचित आहेत.
सातारा जिल्ह्यात मातोश्री वृद्धाश्रम, स्नेह, आनंद, ओमकार, समता आस्था वृद्धाश्रम आहेत. या वृद्धाश्रमात गेले अनेक वर्षापासून महिला-पुरूष असे जेष्ठ नागरिक राहत आहेत. आश्रमांच्या वतीने त्यांच्या आरोग्याची काळजी नेहमी घेतली जाते. मात्र, गतवर्षी दाखल झालेल्या कोरोनामुळे यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. 45 वर्षापुढील सर्वांना लस घेणे बंधनकारक केले आहे. यामुळे जेष्ठ नागरिक रांगेत उभे राहून लस घेत आहेत. या जेष्ठ नागरिकांना त्यांचे नातेवाईक लसीकरण केंद्रावर घेवून येत आहेत. परंतु लॉकडाऊनमुळे वृद्धाश्रमात मदतीचा ओघ कमी झाला आहे. यामुळे या जेष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावर कोण घेवून जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. यातील काही जेष्ठ नागरिक अथंरूणावर झोपून आहेत. त्यांना रूग्णालयात घेवून जाणे शक्य नाही. यामुळे आरोग्य विभागाने वृद्धाश्रमात येवून लस द्यावी अशी मागणी वृद्धाश्रमाच्या संस्थापक, अध्यक्षांकडून होत आहे. मात्र या मागणीवर आरोग्य विभागाने कोणातही विचार केलेला नाही.
मातोश्री वृद्धाश्रमातील 27 जेष्ठांनी घेतला पहिला डोस
महागाव येथील मातोश्री वृद्धाश्रमात 27 जेष्ठ नागरिक आहेत. या जेष्ठ नागरिकांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीचा पहिला डोस दिला आहे. तसेच मंगळवार पेठेतील आनंद वृद्धाश्रमातील 17 जेष्ठापैकी 3 जणांनी लस घेतली आहे. या जेष्ठांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहे. समता वृद्धाश्रमात 20 जेष्ठ नागरिक असून पाच जण अंथरूणावर झोपून आहेत. लॉकडाऊनच्या निर्बंधामुळे वृद्धाश्रमातील मदतीचा ओघ कमी झाला आहे. यामुळे शासनाने प्रत्येक वृद्धाश्रमात लसीकरणाची व्यवस्था करणे गरजेचे आहे.