पालकमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती : आंबा, काजूसाठी हमीभाव निश्चित करणार!
वार्ताहर / वेंगुर्ले:
जिल्हय़ात आंबा पीक तयार झाले असून त्याला वेळीच बाजारपेठ मिळणे गरजंचे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे आंब्याला दर कमी मिळत आहे. काजूचा दरही कोसळला आहे. तसेच काजूच्या बोंडूंची नासाडी होत आहे, अशा स्थितीत स्थानिक पातळीवर आंबा, काजू आणि बोंडूंना योग्य हमीभाव मिळवून देण्यासाठी जिल्हय़ातील फळ प्रक्रिया फॅक्टरीचे मालक, आंबा, काजू बागायतदारांची रविवारी सकाळी 11 वाजता प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात बैठक आयोजित करण्यात आली आह। अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
यावेळी पालकमंत्री सामंत म्हणाले, या बैठकीत रत्नागिरीप्रमाणे फळ प्रक्रिया फॅक्टरी उद्योजक, मालक व आंबा बागायतदारांशी चर्चा करण्यात येईल. यावेळी आंब्यासाठी हमीभाव निश्चित करण्यात येणार आहे. बैठकीत आंबा-काजू बागायतदार शेतकऱयांच्या हिताचा निर्णय घेऊ, असे सामंत म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, सावंतवाडी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर तहसीलदार प्रवीण लोकरे, प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी. एन. सावंत, कीटकशास्त्रज्ञ विजयकुमार देसाई, फळप्रक्रिया विभागाचे सिद्धेश साळवी, प्रमोद मल्हार, मुख्याधिकारी वैभव साबळे, मंडल अधिकारी एस. व्ही. जाधव, पोलीस निरीक्षक तानाजी मोरे, शिवसेना शहरप्रमुख अजित राऊळ, उपजिल्हाप्रमुख आबा कोंडसकर, सुनील डुबळे, सचिन देसाई, सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख यशवंत परब, व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकर, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ आदी उपस्थित होते.