बिबटय़ाच्या दर्शनाने नागरिक व भाविकांच्यात भीतीचे वातावरण
प्रतिनिधी/ वाई
मांढरदेव घाट परिसरासह माळवटार, वेरुळी व सोमेश्वरवाडी या परिसरात काल दिनांक 12 रोजी 5ः30 वाजण्याचा दरम्यान बिबटय़ाचा डोंगर कडय़ावर घनदाट झाडी असल्याने मुक्त संचार दिसून आल्याने मांढरदेव गावातील काही तरुणांनी पाहिले. या तरुणांची या बिबटय़ाचा व्ही.डी.ओ. तयार करून अनेक ग्रुपवर व्हायरल केला आहे. हा बिबटय़ा रात्री 8 वाजणेच्या सुमारास वेरुळी (सोमेश्वर ) येथे फिरत असताना आढळून आला. घाटालगतच्या व दुर्गम सर्वच गावामध्ये गुराखी आपापली जनावरे चारण्यासाठी या परिसरात जात असतात. त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या 15 दिवसापासून मांढरदेव डोंगर रांगामध्ये व धावडी, वेळे येथील सोळशी घाट या परिसरामध्ये यावर्षी वेळोवेळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे झाडाझुडपांमध्ये प्रचंड वाढ झाल्याने वन्य प्राण्यांचा या वाढलेल्या झाडीचा आधार घेऊन बिबटय़ाने आपला मुक्त संचार चालू ठेवून नाग्रीकांच्यात दहशत निर्माण केली आहे. मांढरदेव देवस्थान ट्रस्ट येथील परिसरात 10 दिवसापूर्वी याच बिबटय़ाचा वावर आढळून आला होता. तेथील कुत्र्याची लहान पिले या बिबटय़ाने फस्त केली होती. मांढरदेव पाठीमागे पालान नावाच्या गावातसुद्धा या बिबटय़ाचा वावर आढळून आला होता. त्यामुळे शेतामध्ये काम करणा-या महिला वर्गामध्ये मोठय़ा प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे.या बिबटय़ाचा बंदोबस्त न होताच बालेघरमध्ये देखील मोठय़ा प्रमाणात लांडग्यांचा कळप फिरत असल्याचे आढळून येत आहे. त्यांनी तेथील शेळ्यांच्यावर झडप घालून ठार केल्याचे शेतकरी सांगत आहेत. बिबटय़ाने मांढरदेव येथील शेळ्या फस्त केल्या आहेत. त्यातून त्यांची भूक भागली असून गेल्या 15 दिवसापासून या बिबटय़ाचा धुमाकूळ होत असताना देखील याबाबत वाई शहरातील वन विभागाला कळवूनदेखील वन विभागाचे कर्मचारी बिबटय़ाचा वावर असलेल्या परिसराची फक्त पाहणीच करून आले . वास्तविक पाहता वनविभागाने जीवितहानी होण्याची वाट न पहाता बिबटय़ाला जेरबंद करणे गरजेचे असताना देखील या मुख्य विषयाकडे गांभीर्याने न पहाता वनविभागाने आपली जबाबदारी टाळल्याचे जाणवत आहे. अनेक ठिकाणी यापूर्वी वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या ठिकाणी वनविभागाची तत्काळ कारवाई होत होती परंतु दुर्दैवाने बिबटय़ाबाबत वाई वनविभाग याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने डोंगर पायथ्याच्या ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून तरी वनविभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन तातडीने बंदोबस्त करण्याची मागणीहि नागरिकांनी केली आहे.