प्रतिनिधी/ मडगाव
नुवे, वेर्णा व कासावली परिसरात कलिंगड व अळसांदय़ाची लागवड करणाऱया शेतकऱयांना यंदा किडीच्या प्रादुर्भावामुळे मोठा फटका बसला असून या शेतकऱयांना योग्य ती नुकसान भरपाई दिली जाणार असल्याची माहिती कृषीमंत्री तथा उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी दिली आहे. त्यांनी स्वता वेर्णा भागाला भेट देऊन कलिंगड व अळसांदय़ाच्या शेतीला लागलेल्या किडीची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत नुवेचे आमदार विल्प्रेड उर्फ बाबाशान डिसा उपस्थित होते.
कलिंगड व अळसांदय़ाच्या शेतीला किड लागण्याची ही पहिलीच घटना असून शेतकऱयांनी फंवारणी केल्यानंतर देखील किड आटोक्यात येत नसल्याने, शेतकऱयांना मोठा फटका बसला आहे. ही किड कशामुळे लागली यांचे संशोधन केले जाणार असल्याची माहिती श्री. कवळेकर यांनी दिली.
दरम्यान, गोव्यात सेंद्रिय शेतीचे हब बनविण्याचा संकल्प सोडण्यात आला असून राज्यात सेंद्रिय कृषी विद्यापीठ सुरू करण्यात येणार असल्याची माहिती श्री. कवळेकर यांनी दिली. आज पासून सुरू होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे या संबंधी घोषणा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
गोव्यात सेंद्रिय शेतीला उत्तेजन देण्याचा सरकारचा मानस आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे विद्यापीठ गोव्यात सुरू करण्याचे ठरविले आहे. या विद्यापीठात सेंद्रिय शेतीच्या अभ्यासाबरोबरच नवीन संशोधनाला चालना देण्यात येणार आहे. या विद्यापीठासाठी केंद्र सरकारकडून भरीव मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.