उपजिल्हाधिकाऱयांनी घेतली दखल, कोळसा हटवण्याची सूचना
प्रतिनिधी /वास्को
वेर्णातील रेल्वे स्थानक यार्डात मोठय़ा प्रमाणात कोळसा साठवण्यात येत असल्याचे उघडकीस येताच स्थानिक लोकांनी या प्रकाराला विरोध केला. कोळसा साठवणुकीमुळे लोक संतप्त बनल्याची माहिती मिळाल्याने पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. सासष्टीचे उपजिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी तसेच माजी आमदार विल्प्रेड डिसा घटना स्थळी हजर होऊन त्यांनीही संबंधीत मालवाहतुकीच्या अधिकाऱयांना जाब विचारला. सदर कोळशाचा साठा त्वरीत हटवण्याचा आदेश उपजिल्हाधिकाऱयांनी दिला आहे.
वेर्णातील कोंकण रेल्वेच्या यार्डामध्ये हा कोळसा साठवण्यात आला होता. आमोणेहून वेर्णापर्यंत ट्रकव्दारे या कोळशाची वाहतुक करण्यात आली. वेर्णातील यार्डातून हा कोळसा रेल्वे वाघिणीव्दारे झारखंडला पाठवण्यात येणार होता अशी माहिती संबंधीत अधिकाऱयांकडून देण्यात आली. ऐरव्ही या यार्डातून सिमेंट बॅगा, खत व इतर माल वाहतुक होत असते. मात्र, या ठिकाणी कोळसा साठवण्यात येत असल्याचा प्रकार प्रथमच दिसून आल्याने लोक संतप्त बनले. दुपारी एकच्या सुमारास स्थानिक सरपंच व नागरिकांनी या विरूध्द आवाज उठवला. त्यामुळे नुवेचे माजी आमदार विल्प्रेड डिसा घटना स्थळी दाखल झाले. त्यानंतर वेर्णा पोलीस व सासष्टीचे उपजिल्हाधिकारी प्रसाद वळवईकर व इतर शासकीय अधिकारी दाखल झाले. स्थानिक लोकांच्या तक्रारी ऐकून घेऊन उपजिल्हाधिकाऱयांनी त्या कोळशाशी संबंधी अधिकाऱयांकडे चौकशी केली असता कोळसा वेर्णाच्या रेल्वे यार्डात साठवून त्याची वाहतुक करण्यासाठी गोवा प्रशासनाची कोणतीही अधिकृत परवानगी त्यांच्याकडे नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे उपजिल्हाधिकाऱयांनी त्यांना हा प्रकार बेकायदा असल्याचे स्पष्ट करून कारवाई करण्याचा ईशारा दिला.
मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी 1 हजार 700 टन कोळसा असून कोळसा प्रदुषणकारी असल्याने तो राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या परवानगी शिवाय उघडय़ावर साठवता येत नाही असे उपजिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले. गोवा प्रशासनाकडून परवानगी मिळवलेली असल्यास तो देस्तऐवज सादर करण्यास संबंधीत अधिकाऱयांना बजावण्यात आले आहे. सर्वांत प्रथम तो कोळसा झाकण्यात यावा व त्वरीत तो हटवण्यात यावा असेही उपजिल्हाधिकाऱयांनी बजावले आहे.
घटना स्थळी कोळशाने भरलेले काही ट्रक होते. लोक जमा होण्यापूर्वी काही ट्रक खाली करण्यात आले होते. सुमारे तीस ट्रक लोकांनी खाली करण्यापासून रोखले. या गावात लोकवस्ती आहे. तसेच शेतीभातीही आहे. लोक लागवड करीत असतात. या गावात प्रदुषण सहन करण्यात येणार नसल्याचे ग्रामस्थांनी सुनावले आहे.