तरुण भारत संवाद
प्रतिनिधी/बारशी
वेळापूर – पिसेवाडी जवळ अपघात टँकर व कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात वैराग येथील फलफले कुटूंबातील ६ जण ठार तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. आज, शनिवारी (ता.१) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मृत्यू झालेले सर्व वैराग ( ता . बार्शी ) येथील आहेत . वैराग येथील फलफले कुटूंबीय जेजुरी येथे सकाळी देवदर्शनाला जात होते. मात्र, वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला.
शिवराज नागेश ऊर्फ भगवंत येलपले (वय – ४२) , दिनानाथ ऊर्फ बाबासो भगवंत येलपले( ३६), वनिता शिवराज येलपले(३०), उत्कर्ष शिवराज येलपले( ११), उत्कर्षा ऊर्फ ऊन्नती शिवराज येलपले(७ ), पार्वती महादेव येलपले(७५) अशी मृताची नावे आहेत. तर, पुजा दिनानाथ ऊर्फ बाबासो येलपले( ३०), सई येलपले(५) मायलेकी अशी गंभीर जखमी झालेल्याची नावे आहेत.
वेळापूर – पिसेवाडी जवळ सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना गट सेंटर समोर पुणे – पंढरपूर पालखी महामार्गावर कार आणि सिमेंट वाहतूक करणाऱ्या टँकरची समोरासमोर धडक झाली . या भीषण अपघात कारचा चक्काचूर झाला आहे . या अपघातात कारमधील सहाजणांचा जागीच मृत्यु झाला. यामध्ये दोन मुलांचा समावेश आहे . अपाघातातील सर्वजण सोलापूर जिल्ह्यात वैराग येथील आहेत.
पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत . मृतांना शवविच्छेदनासाठी वेळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले आहे. दोन जखमींवर वेळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत . ट्रक वाहन चालक व वाहक पसार झाले आहेत .