बोलेरोची दुचाकीला धडक, बोरीव गावावर शोककळा
प्रतिनिधी/ भुईंज
महामार्गावर वेळे (ता. वाई) येथे बोलेरोची दुचाकी जोरदार धडक बसली. या धडकेत दुचाकीवर नवविवाहितांपैकी पत्नीच्या डोक्याला जबर मार लागून रक्तस्त्राव झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. पती गंभीर झाले आहेत. अपघातग्रस्त नवविवाहित दाम्पत्य हे बोरी (ता. खंडाळा) येथील असून ते बोरी येथून साताऱयाकडे कामानिमित्त निघालेले होते.
याबाबत अधिक माहिती अशी, उमा भगवान धायगुडे (वय 24, रा. बोरी, ता. खंडाळा) या बोरी येथून पती भगवान धायगुडे (वय 27) यांच्यासह साताराकडे दुचाकीवरून जात असताना पुणे सातारा महामार्गावर वेळे (ता. वाई) येथील हॉटेल पार्क समोर आली असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या बोलेरो गाडीने धायगुडे यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. अपघातात पती पत्नी दुचाकीसह महामार्ग दुभाजकावर आदळून 50 ते 60 फुट फरफटत गेल्याने पत्नी उमा भगवान धायगुडे हिच्या डोक्याला अतिप्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला तर पती भगवान धायगुडे याला डोक्याला व हातापायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
या अपघाताची माहिती भुईंज पोलीस ठाण्याचे स.पो.नि. आशिष कांबळे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळावर हवालदार चंद्रकांत मुंगसे, दत्तात्रय धायगुडे, महिला पोलीस पी. एम. देशमुख यांना तातडीने पाठविले होते. पोलीस घटनास्थळावर दाखल होऊन उमा धायगुडे यांचा मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी कवठे प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविला व पती भगवान यास सातारा येथे पाठवले आहे. नुकत्याच दोन महिन्यापूर्वी अपघातग्रस्त उमा व भगवान यांचा विवाह झाला होता. बोलेरो गाडीने धडक देऊन त्यांना रक्ताच्या थारोळ्यात सोडून गाडी मालक गाडीसह पळून गेला. आणि बोलेरोमालक भरधाव वेगात जाऊन भुईंज पोलीस स्टेशनला हजर झाला.
या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली असून स.पो.नि. आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास हवालदार मुंगसे करीत आहेत. उमाच्या या अपघाती निधनाची बातमी बोरी गावात कळताच ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, गेल्या पंधरा दिवसात याच घटनास्थळावर तिसऱयांदा अपघात झाला असून गेल्या दोन अपघातात वाहनचालक जखमी झाले आहेत. परंतु आज या ठिकाणी महिलेचा बळी गेल्याने हे अपघातग्रस्त ठिकाण पुन्हा एकदा धोकादायक बनला आहे.