प्रतिनिधी/कोल्हापूर
चंद्रकांत पाटील हे एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी वैयक्तिक टीका करणे बंद करावे. त्यांच्यासाठी ही बाब अशोभनी आहे. आम्ही हॉटेलचा हिशेब देण्यास कधीही तयार आहोत. फक्त त्यांनी वेळ आणि ठिकाण सांगावे, आम्ही बॅलन्सशिट घेऊन येवू, अशा शब्दातगृहराज्यमंत्री तथा जिल्हय़ाचे नूतन पालकमंत्री सतेज पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आव्हान दिले आहे. चंद्रकांत पाटील यांनी शिरोलीचे ऐकण्याचे बंद करावे, असा सल्ला देताना थेट पाईप लाईनचे काम पूर्ण करण्याकडे भाजप सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला.
पालकमंत्रीपदी नियुक्त झाल्यानंतर सतेज पाटील गुरुवारी कोल्हापुरात दाखल झाले. यावेळी त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. शासकीय विश्रामगृहावर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, शिरोलीचे ऐकायचं चंद्रकांतदादांनी बंद करावे. त्यांना चिठ्ठी कोणी दिली हे मी जाणून आहे. 2014 पूर्वी आम्ही पाच वर्षे सत्तेत होतो. त्यावेळीच कोल्हापूर शहरवासियांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी मी काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेसाठी प्रयत्न केले. सत्तेत आल्यानंतर तुम्ही थेट पाईपलाईन काही करू शकला नाही. हे दुर्देव असल्याचा टोलाही पालकमंत्री पाटील यांनी माजी पालकमंत्र्यांना लगावला.
सत्ता गेल्यामुळे चंद्रकांत पाटील हवालदिल झाले आहेत. आमच्या संपत्तीविषयी ते भाष्य करतात. त्यांना हवी असल्यास माझी बॅलन्सशिट देतो. त्यांनी दुसऱयाच ऐकून बोलणे बंद करावे. कधीही, कुठेही व केव्हाही बोलवा मी कागदपत्रे घेऊन येण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. गोकुळ दुध संघाविषयी छेडले असता त्यांनी भाजपा 400 ठराव आहेत असे सांगत असेल तरीही, ठरावधारक आमच्याच बाजूनेच मतदान करतील. गोकुळचा निकाल आमच्याच बाजूने लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शिरोलीकरांनी सल्लागार बदलावेत
शिरोलीच्या लोकांनी सल्लागार बदलावे, असा महादेवराव महाडिक यांना नाव न घेता टोला लगावताना चंद्रकांतदादांनी नव्याने आलेल्यांचा सल्ला घेण्याचे बंद करून भाजपच्या जुन्या जाणत्या लोकांचा सल्ला घेणे सुरू करावे, अशी कोपरखळी देखील पालकमंत्री पाटील यांनी मारली.
कोण धनंजय महाडिक
माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता कोण धनंजय महाडिक? असा उपरोधिक सवाल करीत ते महाविकास आघाडीचे घटक आहेत का ?, त्यांच्या बोलण्याकडे कोण लक्ष देणार असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले
सत्ता गेल्याने चंद्रकांतदादांना झटका : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
चंद्रकांत पाटील यांना सत्ता गेल्याचा मोठा झटका बसला आहे. या झटाक्यातून सावरण्याची परमेश्वराने त्यांना शक्ती द्यावी, असा टोला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मारला. शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांच्या टीकेला उत्तर दिले. ठाकरे सरकारच्या मंत्र्यांच्या कारची चाके लोखंडी आहेत. त्यामुळे चाके झिझणार नाहीत आणि सरकारही पडणार नाही. त्यामुळे आमची काळाजी चंद्रकांत पाटील यांनी करू नये, असेही ते म्हणाले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे ठाकरे सरकार फार काळ चालणार नाही मंत्र्यांच्या कारची चाक बदलण्यापूर्वी सरकार कोसळेल, असे भाकित केले होते. याला उत्तर देताना मुश्रीफ म्हणाले, चंद्रकांत पाटील यांना सत्ता गेल्याने झटका बसला आहे. पराभवातून झटक्यातून सावरण्याची परमेश्वराने त्यांना शक्ती द्यावी. सत्ता गेल्याने आलेल्या नैराश्यातून ते बेछूट आरोप करत आहेत. मंत्र्यांच्या कारची चाक बदलण्याआधी ठाकरे सरकार पडेल, असे म्हणणाऱयांनी लक्षात ठेवावे, आमच्या सरकारच्या मंत्र्यांच्या कारची चाके लोखंडी आहेत. त्यामुळे टायर बदलण्याचा प्रश्नच नाही.