प्रकाश ढवण यांची टाकाऊ प्लास्टीक पिशव्यांवर प्रक्रिया करण्याची कला कौतुकास्पद : आकर्षक पुष्पगुच्छ बनवून वाजवी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध
उदय सावंत/वाळपई
दररोज देशांमध्ये निर्माण होणारा कचरा साफ करण्याच्या दृष्टिकोनातून सरकार लाखो रुपये खर्च करीत आहे. वार्षिक अंदाजपत्रकामध्ये कचरा साफ करण्यासाठी कोटय़वधी रुपयांची तरतूद करण्यात येत असते. सध्यातरी सरकारने प्लास्टीकवर पूर्णपणे बंदी घातलेली आहे. ठरावीक मायक्रॉनच्या प्लास्टीकचा वापर बंद करण्यात आलेला आहे. तरीसुद्धा बाजारपेठेमध्ये कमी मायक्रॉनच्या प्लास्टीकचा वापर होताना दिसत आहे. सदर प्लास्टीक वापरण्यात आल्यानंतर टाकाऊ प्लास्टीक उघडय़ावर फेकण्यात येते. यामुळे दररोज कचरा निर्माण होतो. अशा प्रकारच्या कचऱयाच्या निर्मितातून पर्यावरणाचा मोठय़ा प्रमाणाची हानी होताना दिसत आहे. मात्र वाळपई येथील प्रकाश ढवण यांनी प्लास्टीकच्या टाकाऊ पिशव्यांच्या माध्यमातून फुलांचे आकर्षक गुच्छ तयार केले. हे गुच्छ नैसर्गिक फुलांसारखेच भासत आहेत. त्यांच्या हातून निर्माण होणाऱया कलेत जिवंतपणा असून त्यांनी आतापर्यंत बनविलेल्या अशा प्रकारच्या वस्तू लोकांना भूरळ घालणाऱया ठरत आहेत.
प्रकाश ढवण वाळपई नगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये राहतात. त्यांना बालपणापासूनच रंगकामाची भारी आवड होती. सुरुवातीच्या काळात ते मुंबई येथे एका कपडय़ाच्या मिलमध्ये कामाला होते. काही कारणास्तव सदर मिल बंद पडल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा गोव्यातील वाळपई शहरांमध्ये वळविला. अनेक प्रकारचे व्यवसाय केल्यानंतर त्यांच्याकडे उपजत असलेल्या कलेला पुन्हा एकदा उजाळा मिळाला. अनेक वर्षांपासून ते टाकाऊ वस्तूपासून अनेक प्रकारच्या वस्तू बनविण्याचे काम करीत आहेत. सध्यातरी वेगळय़ाच आविर्भावात त्यांनी प्लास्टीकच्या पिशव्यांचा वापर करून सुंदर प्रकारच्या फुलांची निर्मिती करण्यावर भर दिलेला आहे. या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, आतापर्यंत आपण अनेक प्रकारच्या वेगवेगळय़ा फुलांच्या वस्तू बनविलेल्या आहेत. दिसायला अगदी हुबेहूब नैसर्गिक स्वरूपाचे यावस्तू अनेकांसाठी आकर्षण ठरत असतात. सहज नजरेने पाहिल्यास या वस्तू अत्यंत निसर्गनिर्मित असल्याचा भास होतो; मात्र त्या पूर्णपणे टाकाऊ पिशव्यांच्या माध्यमातून बनविण्यात आलेल्या आहेत. वाळपई शहरात उघडय़ावर टाकण्यात आलेल्या पिशव्यांचा वापर करून वेगवेगळय़ा प्रकारची फुले त्यांनी सुंदर पद्धतीने बनविलेली आहेत.
ज्या प्लास्टीक पिशव्यांचा वापर होत नाही त्याचा वापर आपण करुन अशा सुंदर फुलांची निर्मिती करीत असतो. आतापर्यंत याला चांगली मागणी प्राप्त झालेली आहे. अत्यंत वाजवी किमतीत आतापर्यंत त्याची विक्री केलेली आहे. मात्र आपण करीत असलेली फुले ही कामाईसाठी नसून स्वतःच्या समाधानासाठी आहेत, असे यावेळी त्यांनी सांगितले.
प्रकाश ढवण हे गोमंतकतील आघाडीचे कवी आहेत. वास्तवात ते चांगल्या प्रकारच्या कविता करतात. त्याचप्रमाणे अनेक विषयांवर त्यांचे चांगल्याप्रकारे लेखन असते. विडंबनात्मक काव्य करण्यातही त्यांचा चांगला हातखंडा आहे .अशा कवीकडून अशा कलेला मिळालेली वाव खरोखरच कौतुकास्पद आहे.
‘वेस्ट मधून बेस्ट’ अशा प्रकारची संकल्पनेतून आतापर्यंत आपण टाकाऊ पिशव्यांचा वापर केलेला आहे. दुकानातून सामानासाठी वापरल्यानंतर पिशव्या टाकून दिल्या जातात. अनेकवेळा या पिशव्या उघडय़ावर टाकल्या जातात. यामुळे याचा पर्यावरणावर परिणाम होत असतो. आपल्या हातात सापडणाऱया या टाकाऊ पिशव्यांचा वापर करून आपण वेगवेगळय़ा प्रकारची फुले बनविण्यासाठी प्रयत्न करीत असतो. त्याचप्रमाणे टाकाऊ स्वरुपाच्या बाटल्यांचा वापर करून आपण अनेक प्रकारच्या वेगवेगळय़ा वस्तू तयार केलेल्या आहेत.
प्रकाश ढवण, वाळपई