पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्र्यांना ग्वाही
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सलग दुसऱया दिवशी देशातील 14 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. सध्या देशात संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसले तरीही बऱया होणाऱया रुग्णांची संख्याही अधिक असल्याचे सांगितले. काही राज्यांमध्ये उपचारासाठी व्हेंटिलेटरसह आयसीयुची मागणी वाढत आहे. कोरोनाच नव्हेतर कोणत्याही साथीच्या आजारावर मात करण्यासाठी यापुढे वैद्यकीय उपकरणे, सुविधांच्या पूर्ततेवर भर दिला जाईल. आजही मागणीप्रमाणे राज्यांना या सुविधा दिल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी बुधवारी महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांच्या मुख्यमंत्री, उपराज्यपाल तसेच जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालांशी चर्चा केली. यातील जम्मू काश्मीर वगळता अन्य राज्यांमध्ये रुग्णसंख्या आणि बळींची संख्याही अधिक आहे. या परिसंवादामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सहभागी झालेल्या नाहीत. दरम्यान, बैठकीच्या प्रारंभीच भारत-चीन सीमेवर हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या जवानांचे हौतात्म्य वाया जाणार नाही, असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, देशात आज कोरोना संसर्गितांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. तथापि त्याहीपेक्षा बरे होणाऱया रुग्णांची संख्याही अधिक आहे. कोरोनाच्या या संकटाने आपल्याला वैद्यकीयदृष्टय़ाही सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. अनेक राज्यांमध्ये गंभीर आजारी रुग्णांवर उपचारासाठी आयसीयु कक्ष तसेच व्हेंटीलेटरची कमतरता भासत आहे. मात्र अशा उपकरणांची निर्मिती आणि पूर्तता यावर आता भर दिला जाईल. भविष्यात अशा उदभवणाऱया आजारांविरोधात खंबीरपणे लढा देणे यामुळे शक्य होईल, असा विश्वास व्यक्त केला.
राज्यांनी मागणी केल्याप्रमाणे त्यांना आवश्यक ती उपकरणे, सुविधा तातडीने दिल्या जात असल्याचे सांगून मोदी म्हणाले, आता वैद्यकीय उपकरणांबाबतही आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. काही दिवसांपूर्वीच आपल्याला एन35 मास्क, पीपीई कीटची प्रचंड कमतरता भासत होती. परंतु आज याबाबत आपण आत्मनिर्भरच नव्हेतर त्यांची निर्यात करण्याच्या स्थितीवर आलो आहोत. राज्यांच्या मागणीनुसार 1 कोटीहून अधिक पीपीई कीट तसेच 3 कोटीहून अधिक एन 95 मास्कचा पुरवठा केला आहे, असे त्यांनी सांगितले. राज्यांनीही स्थानिक पातळीवरच अशा उपकरणांची निर्मिती आणि पूर्ततेसाठी प्रयत्न करावेत, केंद्र सरकार त्यांना पूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन दिले.
आरोग्य क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधांच्या निर्मितीचे आणि पुरवठय़ाचे यापुढे लक्ष्य ठेवावे लागणार आहे. राज्यांनी कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, त्यासाठी टेस्टींग कीट योग्य प्रमाणात पुरवली जातील, असेही आश्वासन त्यांनी दिले. यामुळे आजारी, संसर्गित तसेच संभाव्य रुग्णांवर गंभीर परिस्थिती होण्याआधी उपचार करणे आणि त्यातून रिकव्हरीचा आकडा वाढवणे शक्य असल्याचे ते म्हणाले.