कचऱयाची उचल करण्याचे काम थांबविण्यात आल्याने समस्या
प्रतिनिधी / बेळगाव
वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्पाला महापालिका प्रशासनाने टाळे ठोकल्याने कचऱयाच्या विल्हवारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. कचऱयाची उचल थांबविण्यात आल्याने साचलेल्या कचऱयाची विल्हेवाट कशी लावायची, असा प्रश्न वैद्यकीय प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. शहरात लहान-मोठय़ा दवाखान्यांमधील वैद्यकीय कचऱयाची उचल ठप्प झाली असून कचऱयाच्या विल्हवारीचा मुद्दा गंभीर बनला आहे.
शहरात तेराशेहून अधिक आरोग्य उपचार केंद्रे असून यापैकी 800 हून अधिक इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य आहेत. दवाखान्यांमध्ये जमा होणाऱया वैद्यकीय कचऱयाची उचल करून खासबाग येथील वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्पामध्ये विल्हेवाट लावण्यात येत असे. सदर काम इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने करण्यात येत होते. पण हा प्रकल्प शहरापासून अन्यत्र स्थलांतर करण्याची सूचना शासनाने केली होती. पण ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही. खासबाग येथील वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प स्थलांतराचे काम 2006 पासून रखडले आहे. स्थलांतरासाठी आतापर्यंत प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेने अनेकवेळा नोटिसा बजावल्या. मात्र, वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प स्थलांतराचे घोंगडे अद्यापही भिजत पडले आहे.
वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्पाला टाळे
येथील प्रकल्पातून निघणारा धूर आणि भुकटीपासून जुने बेळगाव परिसरातील रहिवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कचऱयाची विल्हेवाट लावताना निघणारा धोकादायक वायू नागरिकांच्या आरोग्यास जीवघेणा बनत आहे. कचऱयापासून निघणारा धूर व भुकटीचा त्रास नागरिकांना होऊ नये याकरिता इंडियन मेडिकल असोसिएशनने अत्याधुनिक यंत्रोपकरणे बसविली आहेत. पण प्रकल्पाच्या क्षमतेपेक्षा उत्पादित होणारा वैद्यकीय कचरा अधिक आहे. त्यामुळे हा प्रकल्प नियमितपणे सुरू ठेवावा लागतो. याचा त्रास स्थानिक रहिवाशांना होत असल्याने प्रकल्प स्थलांतर करण्याची मागणी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. याबाबत महापालिकेकडे तक्रार करण्यात आल्याने महानगरपालिका प्रशासनाने वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प प्रकरणी नोटीस बजावली होती. प्रदूषण नियंत्रण मंडळानेही कारवाईचा इशारा दिला होता. त्यामुळे महापालिकेने वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्पाला टाळे ठोकले आहेत. यामुळे कचऱयावर प्रक्रिया करण्याचे काम ठप्प झाले आहे.
दररोज 650-700 किलोवर प्रक्रिया
इंडियन मेडिकल असोसिएशनने कचऱयाची उचल करण्याचे काम थांबविले आहे. सध्या महापालिकेने वैद्यकीय कचऱयाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी काही खासगी कंपन्यांकडे सोपविली आहे. याबाबत बहुतांश वैद्यकीय संस्थांना माहिती नसल्याने कचरा साचवून ठेवण्यात आला आहे. परिणामी वैद्यकीय कचऱयाची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील दवाखान्यांमधून दररोज 650 ते 700 किलो कचरा जमा करून त्यावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्यात येत होती. त्यामुळे वैद्यकीय कचऱयाची विल्हेवाट लावण्याबाबत आवश्यक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
शहरात जमा होणाऱया कचऱयाची उचल करून त्यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. पण महापालिकेने वैद्यकीय कचऱयाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी आयएमएकडे सोपविली असल्याने महापालिकेचा त्रास वाचला आहे. मात्र, महापालिकेनेचे प्रक्रिया प्रकल्पाला टाळे ठोकले असल्याने वैद्यकीय कचऱयाच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने तोडगा काढण्याकडे दुर्लक्ष केल्यास वैद्यकीय कचऱयाची विल्हेवाट लावण्याची समस्या गंभीर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.