प्रतिनिधी / बेळगाव
कर्नाटक हे राज्य शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य आहे. परंतु काही वैद्यकीय शिक्षण संस्था लाखो रुपये घेऊन वैद्यकीय जागा भरून घेत आहेत. यामुळे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांचे नुकसान .होत आहे. गुणवत्ता असूनही पैसे नसल्याने त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे ही पद्धत राज्य सरकारने तात्काळ बंद करावी, अशी मागणी अ. भा. विद्यार्थी परिषदेने केली.
बुधवारी आरपीडी चौक येथे अभाविपतर्फे धरणे आंदोलन केले. काहीकाळ वाहतूक थांबवून विद्यार्थ्यांनी रिंगण करत आंदोलन केले. यामुळे वाहतूक कोंडी झाली. गरीब विद्यार्थी वर्षभर अभ्यास करूनही पैसे नसल्याने तो मागे राहत आहे. काही शिक्षण संस्था लाखो रुपये विद्यार्थ्यांकडून उकळून प्रवेश देत आहेत. विद्यार्थ्यांची प्रगती व्हायची असेल तर हा प्रकार बंद करणे गरजेचे आहे. अशा संस्थांची ईडीकडून चौकशी करावी, अशी मागणी अभाविप पदाधिकाऱयांनी केली. यावेळी शहर सचिव सुरेश चंगोणी, किरण दुकानदार, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.