घरांची छपरे उडाली : अरुळे गावात जास्त हानी : तात्काळ पंचनाम्यांचे आदेश
प्रतिनिधी / वैभववाडी:
अरुळे येथे चक्रीवादळासह झालेल्या मुसळधार पावसाने हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. यात ग्रामस्थांच्या राहत्या घरांच्या छपराचे पत्रे तसेच कौले उडून गेली. दरम्यान, चक्रीवादळाने झालेल्या हानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार रामदास झळके यांनी दिले आहेत.
गेले तीन दिवस तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास तालुक्यात बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळला. सह्याद्री पट्टय़ातील अरुळे, सडुरे, नावळे, निमअरुळे, सांगुळवाडी या भागात चक्रीवादळासह मुसळधार पाऊस झाला. या चक्रीवादळाची अरुळे गावाला सर्वात जास्त झळ पोहोचली.
अरुळे येथील महेश बाळकृष्ण बेळणेकर, दिगंबर शंकर खांबल, अशोक सुभान रावराणे, सुभाष फत्तेसिंग रावराणे, महादेव कर्ले, सुनायना रावराणे यांच्या राहत्या घराच्या छपराचे पत्रे तसेच कौले या वादळात उडून गेली. तसेच अरुळे प्राथमिक शाळेच्या शौचालयाच्या पत्र्यांचे छप्परही उडून गेले.
काही शेतकऱयांची फळे देणारी झाडे उन्मळून पडली आहेत. अनेक ठिकाणी झाडांच्या मोठय़ा फांद्या मोडून पडल्या. तालुक्यात सुमारे दीड तास पाऊस कोसळला. कोरोना स्थितीमुळे कर्मचारी संख्या कमी असल्याने उशिरापर्यंत या नुकसानीचे पंचनामे झाले नव्हते. दरम्यान, तहसीलदार झळके यांनी सर्व तलाठय़ांना आपापल्या सजातील झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. वादळाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.