महिलेचे प्रसंगावधान, संशयित तरुण जंगलात पळाले
वार्ताहर / वैभववाडी:
वैभववाडी शहरातील गणेशनगर येथील शौर्य रवींद्र भागवत या तीन वर्षीय बालकाला दोन अनोळखी व्यक्तींनी पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे त्यांनी बालकाला तेथेच सोडून जंगलात पलायन केले. ग्रामस्थांनी पाठलाग करूनही ते सापडले नाहीत. ही घटना शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. स्थानिक ग्रामस्थ त्या तरुणांचा शोध घेत असता जंगलात फिरणारे पाच कातकरी ग्रामस्थ सापडले. त्यांना स्थानिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले.
वैभववाडी शहरातलगत असलेल्या गणेश नगर येथे शौर्य भागवत हा तीन वर्षाचा बालक घराबाहेर खेळत होता. या दरम्यान दोन अनोळखी तरुण तेथे आले. त्यांनी त्या बालकाला चॉकलेट देतो, असे सांगत जवळ बोलावून घेतले. बालकाला घेऊन ते काही अंतरावर जाताच शेजारच्या घरातील एका महिलेने आपण कोण आहात? बाळाला कुठे घेऊन जाताय, अशी विचारणा करताच बालकाला सोडून ते आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या दिशेने पळून गेले. बालकाला पळवून नेत असल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी त्या तरुणांचा पाठलाग केला. मात्र, ते कॉलेजलगत असलेल्या जंगलात पळून गेले. काही स्थानिकांनी
वाभवे-खांबाळे-सांगुळवाडी ते गगनबावडय़ापर्यंत शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते सापडले नाहीत. या घटनेची उशिरापर्यंत वैभववाडी पोलीस ठाण्यात नोंद नव्हती.