भाजपची एकहाती सत्ता असूनही नगरसेवकांच्या असहकारामुळे निर्णय?
प्रतिनिधी / वैभववाडी:
वाभवे-वैभववाडी नगराध्यक्षा अक्षता जैतापकर यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱयांकडे सुपुर्द केला. नगरसेवक व नगराध्यक्षांमधील वादामुळे हा राजीनामा दिल्याची चर्चा आहे.
वैभववाडी नगर पंचायतीत भाजपची निर्विवाद सत्ता आहे. नगराध्यक्षपदी अक्षता जैतापकर या 24 डिसेंबर 2019 रोजी विराजमान झाल्या होत्या. आमदार नीतेश राणे यांनी त्यांना या पदाची संधी दिली होती. या पदाला न्याय देताना त्यांनी अनेक बाबींवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला होता. न. पं.मधील अंदाधुंदीला त्यांनी काही अंशी चाप लावण्याचा प्रयत्न केला होता. हीच बाब त्यांना त्रासदायक ठरल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे माजी नगराध्यक्ष तसेच काही नगरसेवक यांच्यात वारंवार वाद निर्माण झाले. गेल्या सहा महिन्यात न. पं. च्या विशेषतः नगराध्यक्षांच्या बाबतीत या पदाधिकारी व नगरसेवकांनी असहकाराची भूमिका घेतली होती. त्यामुळे नगराध्यक्षा जैतापकर एकाकी पडत होत्या. नगराध्यक्षा जैतापकर यांच्या कामकाजात अनेकवेळा नगरसेवक व माजी पदाधिकाऱयांनी ‘खो’ घालण्याचा वारंवार प्रयत्न केला होता. त्यामुळे नगर पंचायत एकहाती भाजपच्या ताब्यात असतानाही ठोस विकास साधता आला नाही. नगराध्यक्षांच्या कामात वारंवार हस्तक्षेप होत राहिल्याने सत्ताधाऱयांमध्येच खटके उडत राहिले होते.
4 जून रोजीच्या सभेवरून वाद चव्हाटय़ावर
न. पं.ची 4 जून रोजी सभा घेण्यात आली होती. या सभेवरून नगराध्यक्षा व अन्य नगरसेवक यांच्यातील वाद चव्हाटय़ावर आला होता. ही सभा तहकूब झाल्याचे नगराध्यक्षा जैतापकर यांचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांनी ही तहकूब सभा 9 जून रोजी आयोजित केली होती. या तहकूब सभेला नगराध्यक्षांसह केवळ एक नगरसेवक उपस्थित होता. मात्र, अन्य नगरसेवक व मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी सभेकडे पाठ फिरविली होती. या सभेवरून नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्यात वाद उफाळून आला होता. 4 जूनची सभा उपनगराध्यक्षांच्या उपस्थितीत पूर्ण झाल्याचा दावा मुख्याधिकाऱयांनी केला होता.
भाजप वरिष्ठांची मध्यस्थी अपयशी
या सभेवरून दोन्ही बाजूकडून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. नगर पंचायतीतील सत्ताधारी पक्षातील अंतर्गत वादही उफाळून आला होते. गेल्या सहा महिन्यांत आमदार राणे यांनी सर्व पदाधिकाऱयांना सक्त सूचनाही दिल्या होत्या. अनेक वेळा भाजपच्या वरि÷ांनी नगराध्यक्षा व नगरसेवक यांच्यात मध्यस्थी करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यात अपयश आले. अखेर या सर्व वादातून नगराध्यक्षा जैतापकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.