प्रतिनिधी/ खेड
तालुक्यातील भडगाव येथे बौद्धवाडीची वस्ती असल्याचे भासवत बौद्ध समाजातील काही लोकांच्या बनावट सहय़ा घेऊन स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी विशेष घटक योजनेतून 19 लाखाचा निधी खर्चून पुलाची उभारणी करणाऱया मनसेचे राज्य सरचिटणीस तथा नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी बौद्ध समाजबांधवांची फसवणूक केल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) कोकण विभागीय संपर्कप्रमुख सुशांत सकपाळ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणी कारवाईसाठी 15 दिवसांची डेडलाईन देत ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे.
भडगाव येथे पत्नीच्या नावे असलेल्या चार फ्लॅटकडे जाण्यासाठी पदाचा दुरूपयोग करत पुलाची उभारणी करताना बौद्ध समाजातील रहिवाशांच्या बोगस सहय़ा घेऊन विशेष घटक योजनेतून 19 लाखाचा फंड लाटल्याचा आरोप यापूर्वीच माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केलेला असतानाच त्यात आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानेही उडी घेतली आहे. भरणे येथील हॉटेल बिसू येथे आयोजित पत्रकार परिषदेत कोकण विभागीय संपर्कप्रमुख सकपाळ यांनी खेडेकर यांच्यावर आरोप केले.
ते म्हणाले, खेडेकर यांनी पदाचा गैरवापर करत बौद्ध समाजातील कुठल्याही व्यक्तीला विश्वासात न घेताच बनावट सहय़ा घेऊन स्वतःच्या मालमत्तांकडे जाण्यासाठी पुलाची उभारणी केली. भडगाव येथे बौद्धवाडीची वस्ती नसतानाही या वस्तीसाठीच पुलाची मागणी करणारे परवानगी पत्र प्रशासनाकडे देण्यात आले होते. पदाचा दुरूपयोग करून विशेष घटक योजनेतून पुलासाठी 19 लाख रूपयांचा निधी मंजूर करून घेत पुलाची उभारणी केली आहे.
वैयक्तिक स्वार्थासाठीच हा पूल बांधण्यात आला असून बौद्ध समाजबांधवांची घोर फसवणूक करण्यात आली आहे. या पुलासाठी खर्च करण्यात आलेला निधी दुपटीने तातडीने वर्ग करण्याची मागणी करत खेडेकर यांच्यावर ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई व्हायला हवी. खेडेकरांसह अन्य अधिकाऱयांवर कारवाईसाठी 15 दिवसांची डेडलाईन देत कारवाई न झाल्यास उग्र आंदोलन छेडणार असल्याचेही स्पष्ट केले. याप्रसंगी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष दादा मर्चंडे, तालुकाध्यक्ष रजनीकांत जाधव, आर. पी. येलवे, सुरेंद्र तांबे आदी उपस्थित होते.