प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण भागात खरेदी केलेले वॉटर एटीएम मशीन, घनकचरा व्यवस्थापनासाठी कचरा मशीनची खरेदी व वित्त आयोगाच्या निधी आराखडय़ाबाहेर केलेल्या खरेदीची चौकशी करण्याचे आदेश ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी ग्रामविकास विभागाला दिले आहेत. त्यानुसार या चौकशीसाठी नियुक्त केलेले अधिकारी तथा ग्रामविकास विभागाचे उपसचिव उदय जाधव हे गुरुवारी (25 जून) चौकशीसाठी जिल्हा परिषदेत येणार आहेत. सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ते समिती सभागृहात उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या वेळेत चौकशीच्या कामकाजामध्ये ज्या व्यक्ती, संस्था अथवा लोकप्रतिनिधींना तक्रारी, पुराव्याचे कागदपत्र, निवेदने द्यायची असतील त्यांनी द्यावीत, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी केले आहे.
भाजप आणि मित्र पक्षाची सत्ता असताना वॉटर एटीएमसाठी तब्बल 3 कोटी 64 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. एकूण 86 ठिकाणी वॉटर एटीएम मशीन प्रस्तावित असले तरी प्रत्यक्ष 61 ठिकाणी वाटर एटीएम बसविण्यात आली. मात्र ही मशीन सुस्थितीत नाही. याचा वापरही योग्य प्रकारे होत नाही, वॉटर एटीएम बसविण्यात आल्यापासून ती बंद असल्याने या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सदस्य मनोज फराकटे, विजय बोरगे, प्रसाद खोबरे, राजवर्धन नाईक -निंबाळकर आदी सदस्यांनी केली होती.
सदरची तक्रार ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांच्यापर्यत पोहोचल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची थेट राज्यपातळीवरून चौकशी लावली आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी केलेली कचरा मशीनची खरेदी प्रक्रिया देखील वादाच्या भोवऱयात सापडल्यामुळे त्याचीही चौकशी होणार आहे. यासाठी ग्रामविकास विभागाचे उपसचिव उदय जाधव यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. या दोन्ही मशीनच्या खरेदी प्रक्रियेबाबत ज्यांना तक्रारी द्यायच्या असतील, त्यांनी गुरुवारी सकाळी 11 ते 2 या वेळेत प्रत्यक्ष भेटून अथवा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर dattaram.mandavkar@nic.in पार्श्वभूमीवर या मेलद्वारे सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाठवण्याचे आवाहन आडसूळ यांनी केले आहे.
चौकशीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारी सुरु
वॉटर एटीएम मशीन आणि कचरा मशीनची खरेदी चौकशीसाठी आवश्यक कागदपत्रे आणि माहितीची जमवाजमव करण्यासाठी मंगळवारी जिल्हा परिषदेत धावपळ सुरु होती. प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन चौकशी होणे आवश्यक ज्या गावांमध्ये वॉटर एटीएम मशीन व कचरा खरेदी मशीन दिली आहेत. त्या गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन चौकशी होणे आवश्यक आहे. केवळ समिती सभागृहात आलेल्या तक्रारींवरून चौकशी न करता एटीएम मशीन आणि कचरा मशीन कार्यान्वित आहेत काय ? ती सुस्थितीत आहेत काय ? याची माहिती घेतल्यास अनेक बाबी समोर येतील.