उत्तर प्रदेशातील घटनेवर सरकारचे स्पष्टीकरण
लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशात कोरोनाची लस टोचून घेतल्यानंतर दुसऱया दिवशी एका वॉर्डबॉयचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मात्र, हा मृत्यू लसीकरणामुळे झालेला नाही, असे स्पष्टीकरण आरोग्याधिकाऱयांनी दिले आहे. त्याचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला याचे स्पष्ट उत्तर मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीनंतर मिळणार आहे. पण त्याला लसीची रिऍक्शन आली नव्हती, असे स्पष्ट करण्यात आले. लसीकरणानंतर त्याने रात्रपाळीचे काम पूर्ण वेळ केले होते. त्यावेळी त्याला कोणताही त्रास झाला नव्हता. तो घरी गेल्यानंतर अन्य काही करणाने त्याची प्रकृती बिघडली असल्याची शक्यता आहे. यासंबंधी सखोल संशोधनानंतर माहिती दिली जाईल, असे वक्तव्य आरोग्याधिकाऱयांनी केले आहे.
देशभरात सध्या लसीकरणाचा कार्यक्रम सुरू असून आतापर्यंत चार लाखांहून अधिक लोकांनी लस टोचून घेतली आहे. त्यापैकी केवळ 450 लोकांना सौम्य प्रमाणात रिऍक्शन आली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. केवळ तीन जणांना रुग्णालयात नेण्याची वेळ आली असून एकंदर ही लस निर्धोक असून ती टोचून घेण्यात कोणताही धोका नाही असा निर्वाळा देण्यात आला आहे. लसीकरणाचे 60 टक्के लक्ष्य पूर्ण झाले आहे.