प्रतिनिधी / बेळगाव
शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला आहे. मात्र अनेक समस्यांनी सर्व जनतेला ग्रासले आहे. हे काम संथगतीने सुरू आहे. काही ठिकाणी कामही सुरू करण्यात आलेले नाही. वॉर्ड क्रमांक 56 मध्ये रस्ते, गटारी खराब झाल्या आहेत. मात्र त्यांची दुरुस्ती करण्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले असून तातडीने त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
वॉर्ड क्रमांक 56 मध्ये विविध समस्यांमुळे जनता त्रासली आहे. या वॉर्डमध्ये कोणताही रस्ता चांगला नाही. सर्वसामान्यांना रात्रीच्या वेळी ये-जा करणे अवघड झाले आहे. याचबरोबर गटारीही खराब झाल्या असून पाण्याचा निचरा होत नाही. पाण्याचा निचरा व्हावा यासाठी गटारींची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. तेव्हा याची तातडीने दुरुस्ती करावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महेश शिग्गीहळ्ळी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.