टी-20 च्या मानसिकतेत या!
20 षटकांच्या लढतीतील प्रत्येक अन् प्रत्येक चेंडू महत्त्वाचा असतो आणि अशा क्रिकेट प्रकारात, 20 षटकांच्या खेळात म्हणजे 120 चेंडूंच्या
खेळात जर एखादा संघ 35-36 चेंडू अक्षरशः निर्धाव खेळून काढत असेल तर त्याला काय म्हणावे? पण, सनरायजर्स हैदराबादच्या खेळाडूंनी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आयपीएल साखळी सामन्यात चक्क 6 षटकेच निर्धाव खेळून काढल्यासारखे झाले आणि यामुळे कर्णधार डेव्हिड वॉर्नर आपल्या संघसहकाऱयांवर चांगलाच नाराज झाला. आपल्या खेळाडूंनी सर्वप्रथम टी-20 क्रिकेटच्या मानसिकतेत यावे, असे आवाहन त्याने केकेआरविरुद्ध पराभवानंतर केले.
वॉर्नरने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण, मनीष पांडे (38 चेंडूत 51) व वृद्धिमान साहा (31 चेंडूत 30) यांच्यासह अन्य फलंदाजांना केकेआरच्या शिस्तबद्ध, नियंत्रित गोलंदाजीसमोर मोठी धावसंख्या रचता आली नाही आणि यामुळे ते केकेआरला 143 धावांचे माफक आव्हान देऊ शकले.
दुखापतग्रस्त विजय शंकरच्या स्थानी संघात दाखल झालेल्या बंगालचा यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाने प्रारंभी खूपच संथ सुरुवात केली आणि धावचीत होण्यापूर्वी बरेच चेंडू निर्धाव घालवले. वॉर्नरने याचा अप्रत्यक्ष उल्लेख करत मध्यफळीतील आपल्या फलंदाजांनी अधिक फटकेबाजी करत गोलंदाजांवर दडपण आणणे आवश्यक होते, असे मत व्यक्त केले. टी-20 सारख्या आक्रमक क्रिकेट प्रकारात 35-36 चेंडू निर्धाव घालवणे कधीच माफ करता येत नाही, असे तो म्हणाला. केकेआरविरुद्ध आम्हाला आणखी 20-30 धावा कमी पडल्या, असेही वॉर्नरने एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.