कृषी आणि कृषी व्यवसायाशी संबंधित विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग कृषी उत्पादन क्षेत्रात आता मोठय़ा प्रमाणात होत आहे. माहिती-तंत्रज्ञानांतर्गत स्मार्ट फोनसह विविध संवाद साधनांचा उपयोग ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर होत आहे. परिणामी कृषी उत्पादन-तंत्रज्ञान क्षेत्रात ऍग्रोटेक स्टार्टअप व्यावसायिक संदर्भात अधिक सक्रिय झाले असून त्याचे सकारात्मक परिणाम आता विविध संदर्भात दिसू लागले आहेत.
यासंदर्भातील विशेष उल्लेखनीय व प्रमुख बाब म्हणजे स्मार्टफोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता शेती-तंत्रज्ञान हे घरापासून शेतशिवारापर्यंत पोहोचले आहे. विविध अभ्यासपूर्ण उपक्रम-प्रयोगांद्वारे कृषी क्षेत्रातील उत्पादन व्यावसायिक स्वरुपात संकलित-वितरित करण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न केले जाऊ शकते, याची यशस्वी उदाहरणे विविध ठिकाणी अनुभवता येतात. या व्यवसायपूरक परिस्थितीतून सुरू होऊन विकसित झालेल्या स्टार्टअपचा प्राथमिक अनुभवानुसार त्यांच्या प्रयत्नांमुळे आपल्या कृषी क्षेत्राला प्रगत व फायदेशीर व्यवसायाची जोड मिळून त्यातून विशेषतः ग्रामीण भागात आर्थिक क्रांती होणार आहे. ढोबळ अंदाजानुसार देशांतर्गत ऍग्रो स्टार्टअपतर्फे सद्यस्थितीत सुमारे 15 हजार कोटी शेतकऱयांच्या 14 हजार कोटी हेक्टर्स शेतीचा व्यावसायिकदृष्टय़ा अंतर्भाव करण्यात आला आहे. यातून लक्षणीय स्वरुपात शेतकरी आपल्या शेतीला अधिक उत्पादक आणि आर्थिकदृष्टय़ा उपयुक्त बनवित आहेत.
ऍग्रो स्टार्टअप उपक्रमांमध्ये प्रामुख्याने शेती आणि शेतकरी यांच्याशी संबंधित अशा विविध ठिकाणची व विविध प्रकारची शेती, बी-बियाणे, कृषी उत्पादन-उत्पादकता, धान्याची सकसता, शेतीला अधिक उत्पादक करण्यासाठी उपयुक्त असे तंत्रज्ञान, कृषीविषयक प्रगत ज्ञान व संशोधन शेतकऱयांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विद्यापीठांशी समन्वय इत्यादी प्रकारची कामे करीत आहेत. या उपक्रमांचा शेतकऱयांना आता फायदा देखील होऊ लागला आहे. यासंदर्भात ‘नॅसकॉम’चा 2019 मधील प्रकाशित अहवालानुसार त्यावेळी देशामध्ये सुमारे 800 कृषी स्टार्टअप सक्रियपणे कार्यरत होते. ही संख्या आता नक्कीच वाढली असेल. या नव्या व वाढत्या कृषी स्टार्टअपचे प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे त्यांचा भर नवनव्या व संशोधनपर आणि अभ्यासपूर्ण कार्यवाही-अंमलबजावणीवर आहे. यामध्ये विशेष बाब म्हणून शेतजमिनीचा अभ्यास, मृदसंधारण, वातावरणाचा अभ्यास, वातावरणाचा अंदाज, पर्जन्यमान, कृषी उत्पादित मालाची खरेदी-विक्री, कृषी बाजारातील ठळक घडामोडी, आर्थिक व्यवहार, शेतबाजाराचे अंदाज, शेतमजुरांची कमतरता-उपलब्धता, कृषी माल वाहतूक, शासकीय व कृषी-सहकारी संस्थांची धोरणे इत्यादींचे प्राबल्य दिसून येते. यावरून बदलते शेतकरी-शेती, त्यांच्या बदलत्या गरजा आणि कार्यपद्धती याचा अंदाज सहजपणे घेता येतो.
तसे पाहता ऍग्री-स्टार्टअपची सुरुवात ही मुळात शेतकऱयांच्या आर्थिक गरजा आणि अर्थसाहाय्य यांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने झाली. ‘ऍग्नीव्होर’ या कृषी अर्थसाहाय्य क्षेत्रात प्रामुख्याने काम करणाऱया ऍग्रो स्टार्टअपचे व्यवस्थापकीय संचालक मार्क कहान यांच्या मते जेव्हा त्यांनी त्यांच्या स्टार्टअपची सुरुवात केली तेव्हा त्यांना मर्यादित प्रतिसाद मिळाला. त्यांच्यासोबत काम करणाऱया विषयतज्ञांची संख्या पण अर्थातच मर्यादित होती. मात्र, आता परिस्थितीत बराच बदल झाला आहे. शेतकऱयांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता या स्टार्टअपचा आवाका आणि कार्यक्षेत्र वाढत आहे. आर्थिक संदर्भात तपशीलासह सांगायचे झाल्यास ऍग्रो स्टार्टअप कंपन्यांनी गेल्या आर्थिक वर्षात 133 आर्थिक व्यवहारातून 1 कोटी डॉलर्सचे भांडवल जमविले. आधीच्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत डॉलर्समधील गेल्या वषीच्या गुंतवणुकीचे हे प्रमाण सुमारे 6 टक्के अधिक होते. यासंदर्भात फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स व इंडस्ट्रीज आणि प्राईम वॉटर कूपर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात असे प्रामुख्याने नमूद करण्यात आले की ऍग्रो स्टार्टअपमधील नवी गुंतवणूक ही कृषी आणि कृषी उद्योग या उभय क्षेत्रांसाठी उत्साहवर्धक ठरणारी आहे.
या सर्वेक्षणात असे पण नमूद करण्यात आले, की सद्यस्थितीत शेती आणि शेतकरी या उभयतांमध्ये व्यावसायिक संदर्भात लक्षणीय बदल झाले आहेत. यातूनच शेतकऱयांच्या मनःस्थिती वा मानसिकतेमध्ये देखील बदल झाले आहेत. शेतकऱयांनी दरडोई घटत्या शेतजमिनीच्या आकारावर एक वास्तव व व्यावहारिक उपाय म्हणून प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब यापूर्वीच सुरू केला असून त्याचे फायदे पण त्यांना मिळू लागले आहेत. याशिवाय आपल्या कृषी उत्पादनाला योग्यवेळी व अधिक चांगला भाव मिळावा यासाठी शीतगृहांचा वापर करून शेती अधिक फायदेशीर करण्यावर त्यांचा आता भर आहे. ऍग्री स्टार्टअप क्षेत्रात आर्थिक गुंतवणुकीला विशेष चालना देण्यासाठी सक्रिय असणाऱया ‘इकोझोन’ कंपनीचे संस्थापक देवेंद्र गुप्ता यांनी नमूद केल्यानुसार सध्या कृषी उद्योग व त्यातही ऍग्रोटेक स्टार्टअपद्वारा शीतगृह, सौर पाणीपंप व संगणकीय म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने काम करण्यावर विशेष भर देण्यात येतो व त्याचा फायदा शेतकऱयांसह सर्व संबंधितांना होत आहे. मुख्य म्हणजे या सर्व प्रगत उपक्रमांना सरकारी योजनांद्वारे आर्थिक पाठबळ मिळत आहे. असे असले तरी प्रगत काम करून ऍग्रोस्टार्टअप क्षेत्रात काम करणाऱयांपुढे काही आव्हानेही निश्चितपणे आहेत. यापैकी सर्वात प्रमुख आव्हान म्हणजे अत्यंत प्रगत तंत्रज्ञान व अद्ययावतपणाला शेतशिवारात उपयुक्त ठरेल अशा पद्धतीने त्याचा अवलंब करणे. शेती क्षेत्रात त्याला व्यावहारिक स्वरुप देणे आव्हानपर असले तरी त्याचा अवलंब होऊ लागला हे उत्साहवर्धक आहे.
दुसरा मुद्दा कृषीला अधिक प्रगत आणि उपयुक्त बनविण्यासाठी प्रगत शेतकऱयांची संख्या आणि प्रमाण अद्यापही मर्यादित आहे. एका अंदाजानुसार आजवर देशातील सुमारे 30 टक्के शेतकरीच कृषी स्टार्टअपशी संबंधित आहेत. ही टक्केवारी प्रयत्नपूर्वक वाढविणे गरजेचे आहे. आपल्या शेतकऱयांच्या गरजा व आवश्यकता यांची पूर्तता करण्यासाठी एकाच ठिकाणी समस्या-सोडवणूक व्हावी अशी रास्त अपेक्षा असते. शेतकऱयांच्या या मुख्य अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे सुरू झाले आहे. वानगीदाखल सांगायचे झाल्यास ‘दे हात’ या सारख्या ऍग्रो स्टार्टअपद्वारा शेतकऱयांना त्यांच्या ठिकाणी- शेतशिवारात त्यांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी विशेष प्रयत्न करीत असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसे पाहता भारतात कृषी तंत्रज्ञान व त्याचा अवलंब या बाबी तशा अद्यापही प्राथमिक व प्रयोगावस्थेत आहेत. अर्न्स्ट अँड यंग या आर्थिक व्यवस्थापन क्षेत्रातील आघाडीच्या सल्लागार कंपनीतर्फे करण्यात आलेल्या अभ्यासानुसार देशाच्या एकूण कृषीविषयक वार्षिक उलाढालीपैकी केवळ 1 टक्के उलाढाल ही सध्या कृषी-तंत्रज्ञान वा ऍग्रो स्टार्टअप व्यवस्थेमध्ये सामील झाली आहे. यासंदर्भात विशेष उल्लेखनीय योगदान म्हणून बेंगळूर येथील ‘कृषी कल्प’ या स्वयंसेवी संस्थेच्या प्रयत्नांचा उल्लेख करावा लागेल. संस्थेतर्फे कृषी क्षेत्रांतर्गत शेती आणि शेतकरी या उभयतांना ऊर्जितावस्थाच नव्हे तर प्रगतीशील बनविण्यासाठी शेतकरी, सरकारी अधिकारी व कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱयांमध्ये सहकार्यासह समन्वय साधण्यासाठी ऍग्रो-स्टार्टअप पद्धतीने गेल्या वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत.
– दत्तात्रय आंबुलकरtar