सृष्टीतील प्रत्येक जीव स्वतःच्या सुरक्षेबाबत नकळतपणे का होईना पण जागृत असतो. सुरक्षा कुठल्याही स्वरूपाची असो त्यात शाश्वती असते आणि एक प्रकारचा मोकळेपणा असतो. आर्थिक बाबतीतील सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची असते. कारण, भविष्यातील अनेक अनपेक्षित प्रश्नांवर योग्य तोडगा या आर्थिक सुरक्षेमुळेच मिळतो.
व्यवस्थापनशास्त्रात सुरक्षेला अतिमहत्त्व देण्यात आलेले आहे. व्यवस्थापनशास्त्रानुसार सुरक्षा म्हणजेच संतुलन होय! एखादा उपक्रम जर संतुलित असेल तरच तो उपक्रम हा सुरक्षित आहे असे व्यवस्थापनशास्त्रात सांगतात. कुठलीही गोष्ट संतुलित करायची असल्यास आधी त्या गोष्टीचा नीट अभ्यास करावा लागतो आणि त्यानंतरच ती गोष्ट संतुलित केली जाते.
जेव्हा एखादा नवीन उद्योग किंवा उद्योगसमूह भरभराटीस येत असतो त्यावेळी काही हितशत्रू हे त्या उद्योगसमूहाचे निर्माण झालेले असतात. या हितशत्रूंमुळे बाजारपेठेत राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर संबंधित उद्योग समूहाचे नाव बदनाम केल्या जाण्याचे षड्यंत्र रचले जाते. या षड्यंत्राला जर सामोरे जायचे असेल तर उद्योग समूहातील मालक, संचालक, अधिकारी, कर्मचारी आणि कामगार यांच्यात एक विश्वासाचा संतुलित धागा निर्माण करणे गरजेचे असते. हाच संतुलित धागा म्हणजेच त्या संबंधित उद्योगसमूहाची सुरक्षा होय!
अब्राहम मास्लो यांनी त्यांच्या सिद्धांतात सुरक्षात्मक गरजेचा क्रम हा शारीरिक गरजेच्या क्रमानंतर लावला आहे. मनुष्याला भीती आणि धोक्मयापासून मुक्त व्हायचे असल्यास त्यास शारीरिक आणि भावनात्मक गरज हवी असते. श्रीसमर्थांनी या सुरक्षात्मक गरजांविषयी दासबोधात असे सांगितले आहे की,
देहसमंधावरी लोटला !
संकल्पावारी उठावला !
कल्पनेचा घात केला !
अकस्मात !!
अपधाकासी ताडिले !
लिंगदेहासी विभांडीले !
पाषांडास पछय़ाडीले !
विवेकबळे !!
गर्वावरी गर्व केला !
स्वार्थ अनर्थी घातला !
अनर्थ तोही निर्दाळीला !
नीतिन्याये !!
42-43-44/09/05
ह्याचा अर्थ असा आहे की, साधक हा देहाचे अस्तित्व मिटवून टाकतो आणि मी देह नसून आत्मा आहे ही भावना स्वतःमध्ये दृढ करतो. साधक मनातील संकल्परूपी सैन्य नष्ट करतो आणि कल्पना करणे बंद करतो. साधक स्वतःच्या सूक्ष्म देहाला जिंकतो आणि वासनांना पराभूत करतो. विवेकाच्या मदतीने साधक पाखंडी मतांचा तेजोभंग करतो. साधक ‘मी ब्रह्म आहे’ या अभिमानाने ‘मी देह आहे’ हा अहंकार मारून टाकतो. साधक नीतीन्यायाने स्वतःचे दुर्दैव आणि देहबुद्धी मारून टाकतो. देहाचा अकल्याणकारी मार्ग सोडून साधक देवाचा कल्याणकारी मार्ग अवलंबितो.व्यवस्थापनशास्त्राच्या दृष्टीने श्रीसमर्थांनी सांगितलेला साधक म्हणजेच एक उत्तम उद्योगसमूहाचा मालक, संचालक, अधिकारी, कर्मचारी किंवा कामगार असू शकतो. जो मालक स्वतःचा उद्योगसमूह वाढवण्यासाठी स्वतःचे अस्तित्व विसरून दिवसरात्र मेहनत घेतो तो/ती एक सुरक्षित, संतुलित वातावरण निर्मिती संबंधित उद्योग समूहात तयार करत असतात. तसेच जे संचालक मंडळ स्वतःमधील अहंकार, अहंभाव दूर सारून उद्योगसमूहांच्या भरभराटीकरिता झटत असतात त्यांचेच उद्योगसमूह नावारूपाला येतात. औद्योगिक क्षेत्रात महत्त्वाचे असते ते संतुलन. हे संतुलन संबंधित संचालक मंडळाच्या वागणुकीवर आणि निर्णय क्षमतेवर अवलंबून असते. ही क्षमता वाढवायची असेल तर सातत्याने दासबोधाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. दासबोधाच्या सतत चिंतनाने भविष्याविषयीचे भय संपून जाते कारण निर्माण होणाऱया प्रश्नांची उत्तरे तात्काळ मिळायला लागतात. पुढे येणारे अडथळे आधीच कळायला लागतात आणि हळूहळू प्राप्त परिस्थितीवर प्रभुत्व प्रस्थापित करण्याची कला आपोआप आपण शिकतो. अधिकारी वर्गसुद्धा दासबोधाच्या चिंतनाने निर्भय होतो आणि त्यांचे कर्मचारी आणि कामगारांशी संबंध सुधारतात. यातूनच उद्योगसमूहात सुरक्षित वातावरण तयार होते. कर्मचारी आणि कामगारांमधील एकोपा हा संतुलित कार्यपद्धती निर्माण करतो आणि शारीरिक आणि भावनिक सुरक्षा निर्मिती होते. अहंकाररूपी शत्रूला नष्ट करून निस्वार्थपणे एकनि÷sने कार्य करणारे संचालक, अधिकारी, कर्मचारी आणि कामगार दिवसेंदिवस उद्योगसमूहाला भरभराटीस नेत असतात.
त्यांच्यातील आपापसातील भेद नष्ट झालेला असतो आणि त्यांनी त्यांचे सर्वस्व हे आपल्या उद्योग समूहाच्या प्रगतीकरिता अर्पण केलेले असते. कल्याणकारी मार्गाचा अवलंब करून ते स्वतःसहित, समाजाचा आणि राष्ट्राचा विकास करत असतात.
माधव किल्लेदार