मनुष्य जीवनाचे आजकालच्या काळात तीन टप्पे आहेत, असे आपण म्हणू शकतो. पहिला टप्पा बालपण, दुसरा टप्पा तरुणपण आणि तिसरा टप्पा म्हातारपण अथवा वृद्धापकाळ होय. पूर्वीच्या काळी ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास हे चार आश्रम होते. त्यानुसार मनुष्यजीवन जगले जायचे किंवा नियंत्रित केले जायचे. पण जसा काळ बदलत गेला तसे जीवनाचे चक्र बदलत गेले. त्यात परिवर्तन होत गेले. जीवन जगण्याच्या कक्षा आणि कालमर्यादा यात बदल घडत गेले. सर्व कालक्रमणात किंवा स्थित्यंतरात सातत्याने एक गोष्ट समान होती, आहे आणि राहणार ती गोष्ट म्हणजे मनुष्याची अनुकरणीय वृत्ती.
जे बालपणात पाहिले, अनुभवले आणि अनुकरणीय करावेसे वाटले त्याचेच प्रतिबिंब तरुणपणात उमटले. पुन्हा जे तरुणपणात अनुभवले आणि अनुकरण केले गेले तेच वृद्धापकाळी जीवनाची शिदोरी म्हणून उपयोगास आले. ह्या सर्व जीवन प्रवासात स्थळ, काळ, व्यक्ती आणि समाजात आमूलाग्र बदल झाले आहेत पण अनुकरणीय वृत्ती मात्र बदलत गेली नाही.
व्यवस्थापनाच्या क्षेत्रात ज्या व्यक्तींचे उद्दिष्ट निश्चित असतात त्यांना योग्य मार्ग मिळतात. शर्थीचे प्रयत्न केले गेल्यास त्यांचे उद्दिष्ट साध्य होतात. त्यांचे प्रयत्न परिणामकारक ठरतात. उद्दिष्ट योग्य कालावधीत पूर्ण व्हायला विशेष असे महत्त्व आहे. मूल्यमापन किंवा तुलना हा जीवन जगण्याचा मार्ग होऊ शकत नाही पण व्यवस्थापकीयदृष्टय़ा मात्र मूल्यमापन करणे हे अत्यंत गरजेचे असते. कारण, जी उद्योगसंस्था अथवा जे औद्योगिक समूह स्वतःच्या कार्याचे मूल्यमापन करू शकत नाहीत त्यांचे व्यवस्थापन अपयशी ठरले आहे असे म्हणता येईल.
ठरवलेल्या कालमर्यादेमध्ये उपलब्ध असलेल्या साधनांच्या आधारे स्वतःच्या वाटचालींचा सातत्याने केला गेलेला विचार योग्य आहे किंवा नाही आणि त्याचा नियमितपणे आढावा घेतला जातो आहे किंवा नाही ह्या निरंतर प्रक्रियेस व्यवस्थापनशास्त्रात मूल्यमापन असे म्हणतात. व्यक्ती व्यक्तीचे मूल्यमापन करते जर ते योग्य वाटले तर त्याचे अनुकरणही करते. शिक्षक विद्यार्थ्यांचे जसे मूल्यमापन करतात तसे विद्यार्थी पण शिक्षकांचे मूल्यमापन करतात. आई-वडिलांचे मूल्यमापन मुले करतात आणि जर ते अनुकरणीय वाटल्यास त्यांचे अनुकरणही करतात. बऱयाच वेळी मूल्यमापन जर योग्य झाले नाही किंवा बरोबर वाटले नाही आणि तरीही ते अनुकरणीय झाले तर मात्र त्याचे वाईट परिणाम हे व्यक्ती, समूह, समाज आणि राष्ट्राला भोगावे लागतात.
समर्थांनी अतिशय सूचक शब्दात ह्याविषयी सांगितले आहे ते असे,
कोणीयेक कार्याचा साक्षेप ! कांही तऱही घडे विक्षेप!
काळ साहे तें आपोआप !होत जाते !!
कार्यभाग होत चालीला !तेणे प्राणी शोक जाला !
विचारही सुचो लागला !दिवसेंदिवस !!
अवघाची कळ जरी सजे !तरी अवघेची होती राजे !
काही सजे काही न सजे ! ऐसें आहे !! 18/01/01-02-04
ह्याचा अर्थ असा आहे की, एखादे कार्य सिद्ध करण्यास सुरुवात केली की, काहीतरी विघ्ने येतातच. परंतु, काळाचे सहाय्य असेल तर कार्य आपोआप होत जाते. कार्यात जसजशी प्रगती होते तसतसा माणसाचा उत्साह वाढत जातो आणि त्याला नवनवीन विचार सुचू लागतात. काळ जर नेहमीच अनुकूल राहिला तर सगळेच राजे होतील. पण जीवनात काही काळ अनुकूल तर काही काळ प्रतिकूल असा क्रम असतो.
व्यवस्थापनाच्या दृष्टीने विचार करायला गेल्यास कुठलीही संस्था अथवा उद्योग सुरू करायचा असल्यास त्यात अनेक अडचणी येणारच. पण कार्यारंभीच जर योग्य सहकारी असतील तर त्या उद्योगाला लवकरात लवकर भरभराट येऊ शकते. जसजसा उद्योग समूह वाढत जातो तसतसा त्या उद्योगसमूहातील कर्मचाऱयांचे मनोबल वाढत जाते. नवीन कल्पना, नवीन विचार रुजू लागतात आणि त्याचा फायदा सर्वांनाच होतो. परंतु, जर व्यवस्थापन योग्य असेल तरच अशाप्रकारची प्रगती साध्य होते. परिस्थिती जर नेहमीच अनुकूल राहिली तर नेहमीच संबंधित उद्योग समूह आघाडीवर राहील. पण असे शक्मय होत नाही कारण प्रत्येक वेळी औद्योगिक संस्थेत उत्तम व्यवस्थापन असेलच असे नाही. पुढे समर्थ म्हणतात की,
येहलोक अथवा परलोक !साधता कोणीयेक विवेक!अद्भूत होये स्वाभाविक ! देणे ईश्वराचे !! 18/01/05 म्हणजे, प्रपंचात आणि परमार्थात जर खरा विवेक करणे साधले तर काही तरी अद्भूत कार्य हातून घडेल. हे घडणे म्हणजेच ईश्वरी कृपेचे फळ आहे. व्यवस्थापनाच्या दृष्टीने पहायला गेल्यास असे जाणवेल की, आपल्यापेक्षा उच्चपदस्थ अधिकाऱयाचे जर योग्य मूल्यमापन केले तर आपल्या हातून अद्भूत कार्य घडेल. पण जर योग्य मूल्यमापन न करताच केवळ अनुकरण केले तर मात्र अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. हा अनर्थ टाळायचा असेल तर विवेकशक्ती जागृत करणे गरजेचे आहे.
कुठलाही मनुष्य हा जन्मतःच ज्ञानी नसतो. तो जसजसा घडत जातो तसतसे दुसऱयाकडून पाहतो, ऐकतो, शिकतो आणि त्यानंतर शहाणा होतो. म्हणजेच विवेकी होतो. म्हणून श्रवण आणि मनन खूप आवश्यक आहे.
प्रत्येक औद्योगिक संस्थेतील कर्मचाऱयांनी केलेले प्रयत्न हे एक प्रकारची विशिष्ट निष्पत्ती निर्माण करतात. कर्मचाऱयांवर सोपवलेले काम आणि त्यांचे प्रयत्न यांचे परस्परांशी केलेले तुलनात्मक निरीक्षण म्हणजेच मूल्यमापन होय. कर्मचाऱयांवर सोपविण्यात आलेले काम आणि कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी केल्या गेलेल्या वस्तुनि÷ आणि पद्धतशीर प्रक्रियेलाच कार्यसिद्धी मूल्यमापन असे म्हटले जाते.
औद्योगिक संस्थेतील कर्मचाऱयांची भरती व नेमणूक त्यांच्या योग्यतेनुसार त्यांचे काम तपासून पाहणे, कर्मचाऱयांना प्रशिक्षण, मानवी संसाधन व्यवस्थापनाची कार्यक्षमता व कार्य करण्याकरिता निर्माण करण्यात आलेल्या विभागाने वेळोवेळी घेतलेले निर्णय व निर्णयांची परिणामकारकता यात या सर्वांचा एकंदरीत परिणाम म्हणजेच कार्यसिद्धीचे मूल्यमापन होय. साडेतीनशे वर्षांपूर्वी समर्थांनी अतिशय साध्या सोप्या भाषेत अनुकरण आणि मूल्यमापन हे दासबोधाच्या माध्यमातून समजावून सांगितले.
माधव किल्लेदार