प्राचीन काळी पृथ्वीच्या पाठीवर दोन राज्ये होती. त्यातील एक खूप मोठे राज्य होते. त्या राज्याचे क्षेत्रफळ खूप मोठे होते. तेथील लोकसंख्या प्रचंड होती. अनेक मोठ-मोठे उद्योग, व्यवसाय तेथे चालायचे. त्यामुळे त्या राज्याची अर्थव्यवस्था खूप उत्तम होती. राज्यात सर्वत्र आनंद, सुख शांतता होती.
परंतु, दुसरे राज्य मात्र पहिल्या राज्याच्या तुलनेत खूप लहान होते. तेथील लोकसंख्या खूप कमी होती. राज्यात चांगले उद्योग-व्यवसाय नव्हते. बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याने राज्यात सुख शांतता नव्हती. त्यामुळे राज्यातील काही लोकांनी राज्याच्या सीमा ओलांडून दुसऱया राज्यात प्रवेश करण्यास सुरुवात केली. पण, त्यामुळे दोन्ही राज्यांच्या सीमांवर संघर्ष सुरू झाला. ह्याचा परिणाम युद्धात झाला आणि जे राज्य लहान होते त्याचा पराभव झाला. ह्या पराभवामुळे राज्यातील जनतेत खूप असंतोष निर्माण झाला. असंतोषाचे परिणाम राज्याच्या सर्वच स्तरांत जाणवू लागले. त्यावेळी राज्यातील काही सुज्ञ विद्वान लोकांनी ह्या समस्येवर उपाय शोधण्याचे ठरवले. सुरुवातीला ह्या सूज्ञ लोकांनी राज्यातील लोकांचे वर्तन, कार्यक्षमता आणि गुण संवर्धन कसे होईल ह्याकडे लक्ष दिले. त्यानंतर आपल्या राज्यातील लोकं चारित्र्यसंपन्न कसे होतील ह्यावर काम करण्यास सुरुवात केली. त्याकरिता लोकांना प्रशिक्षित करण्यास प्रारंभ केला. काही दिवसातच ह्या उपक्रमांमुळे राज्यातील लोकांमधील सकारात्मक बदल दिसायला लागला. लोकांमधील कार्यक्षमता, राष्ट्रप्रेम आणि चारित्र्यवान समाज निर्मिती होण्यास सुरुवात झाली. राज्यातील ह्याच सुज्ञ आणि जाणकार लोकांनी परराज्यातील नागरिकांच्या मानसिकतेचा अभ्यास केला. त्यांच्यातील अवगुण, दोष आणि स्पर्धात्मक वृत्ती लक्षात घेतली. शत्रू राज्याच्या उपेक्षित घटकांकडे लक्ष वेधून त्याचा फायदा आपल्या राज्या करिता कसा करता येईल ह्याचा विचार करण्यास सुरुवात केली. शत्रू राज्यात संपन्नता असल्याने तेथील सर्वच लोकं हे सुखवस्तू कुटुंबातील होते. भविष्याची चिंता त्यांना भेडसावित नव्हती. त्यामुळे तेथील लोकांमधील अकार्यक्षमता वाढीस लागली आणि पर्यायाने चारित्र्यहीन समाजाची निर्मिती होण्यास सुरुवात झाली. शत्रू राज्यातील अनेक लोक हे फितूर झाले होते.
ह्याच सर्व गोष्टींचा फायदा जे राज्य लहान होते त्याने घेण्यास सुरुवात केली. त्याकरिता त्यांनी मैत्रीचा प्रस्ताव शत्रू राज्याला पाठवला. शत्रू राज्याने सुद्धा ह्या प्रस्तावास मान्यता दिली आणि मैत्रीच्या प्रस्तावाच्या निमित्ताने दोन्ही राज्यातील उत्तम कुस्ती खेळाडूंचा कुस्तीचा सामना आयोजित केला.
कुस्तीच्या सामन्याला तीन महिने वेळ होता. त्यामुळे, लहान राज्यातील जाणकार लोकांनी शत्रू राज्यातील कुस्ती खेळाडूंच्या शिक्षकांशी संपर्क साधला. त्यांना हे पटवून दिले की कुस्तीच्या सामन्यात जर आमच्या राज्यातील कुस्तीपटू जिंकलेत तर ते तुमचे शिष्यत्व पत्करतिल आणि आमचे राज्य तुम्हाला मान, सन्मान आणि खूप धन देईल. पण, ह्या करिता अट एकच आहे की कुस्तीतील एक डाव तुम्ही राखून ठेवायचा आणि तुमच्या विद्यार्थ्यांना तो डाव अजिबात शिकवायचा नाही. त्या फितूर शिक्षकांनी ह्या मागणीस होकार दिला आणि त्याप्रमाणे त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवले नाही. तीन महिन्यानंतर कुस्तीचा सामना दोन्ही राज्यात रंगला आणि लहान राज्यातील कुस्ती खेळाडूंनी सामना जिंकला. शत्रूराज्याकरिता हा पराभव जिव्हारी लागणारा होता. ह्याचा परिणाम असा झाला की, शत्रू राज्यातील कुस्ती खेळाडू त्यांच्याच शिक्षकांवर उलटले आणि त्यांच्या अंगावर धावून गेले. शिक्षकांनी त्यांना कुस्तीतील एक डाव शिकवला नसल्याने ते विद्यार्थी हरलेत. शत्रू राज्यात ह्या घटनेचा परिणाम सर्वत्र जाणवायला लागला आणि सर्वच स्तरातील शिक्षक विद्यार्थी संघर्ष सुरू झाला. पुढे ह्या संघर्षाने अंतिम टोक गाठले आणि राज्याची अवनती होण्यास सुरुवात झाली. काही कालावधीनंतर हे राज्य लयास गेले आणि लहान राज्याने मोठय़ा राज्याचा ताबा घेऊन आपल्या प्रभावाचा सूड घेतला. मोठय़ा राज्याच्या पराभवाची पाळंमुळं ही त्यांच्या अकर्मण्यतेत होती. अकार्यक्षमतेमुळे अवगुणांची वृद्धी झाली. अवगुणांची वृद्धी झाल्याने चारित्र्यहीन समाज निर्माण झाला आणि त्यामुळे तेथील लोकांचा एकमेकांवरील विश्वास नष्ट झाला. व्यवस्थापनशास्त्रात सुद्धा अविश्वासामुळे आणि अज्ञानामुळे अनेक कठीण प्रसंग निर्माण होतात. औद्योगिक संस्थेतील व्यवस्थापकांच्या चारित्र्य आणि संस्कृतीचे प्रतिबिंब संबंधित औद्योगिक संस्थेतील कर्मचारी वर्गावर पडत असते. व्यवस्थापकांच्या नावानेच उद्योग समूह ओळखले जातात. जर औद्योगिक संस्थेतील व्यवस्थापक संस्थेमुळे ओळखले जात असतील तर व्यवस्थापकांच्या चारित्र्यात उणीव आहे असे समजावे. अशा व्यवस्थापकांमुळे उद्योग संस्था लयाला जात असतात.
ह्याविषयी श्रीसमर्थांनी श्रीमददासबोध ग्रंथात असे म्हंटले आहे की,
“वर्तल्यावीण सिकवी ।
ब्रम्हज्ञान लावणी लावी।
पराधेन गोसावी।
तो येक पढतमूर्ख ।।
प्रपंच गेला हातीचा।
लेश नाहीं परमार्थाचा।
द्वेषी देवा ब्राह्मणांचा ।
तो येक पढतमूर्ख ।।02/10/36-38’’
ह्याचा अर्थ असा आहे की, आपण स्वतः जसे वागावे तसे न वागता इतरांनी आपल्या म्हणण्यानुसार वागावे हि अपेक्षा बाळगणारा. अर्थार्जनासाठी ब्रम्हज्ञानाची पेरणी करणारा. लोकांना ब्रम्हज्ञान सांगत सुटणारा आणि पण चरितार्थासाठी इतरांवर अवलंबून राहणारा. अशा माणसांच्या हातून प्रपंच निघून गेलेला असतो आणि परमार्थाबाबत त्याला काहीही माहिती नसते. तो स्वतःचे संपूर्ण आयुष्य देवा-ब्राह्मणांच्या द्वेषात घालवतो.
व्यवस्थापनशास्त्राच्या दृष्टीने विचार केल्यास असे जाणवते की, असे अनेक व्यवस्थापक उद्योगसमूहात असतात की जे जसे बोलतात तसे वागत नाहीत. परंतु, कर्मचाऱयांकडून मात्र त्यांना खूप अपेक्षा असतात. ते इतरांना खूप उपदेश करतात पण स्वतः मात्र इतरांवर अवलंबून असतात. उद्योग समूहात त्यांचे अस्तित्व शून्य झालेले असल्याने ते आपल्यापेक्षा श्रे÷ व्यवस्थापकांचा किंवा आपल्यापेक्षा गुणी कर्मचाऱयांचा द्वेष करतात. श्रीसमर्थांचा दासबोध सातत्याने वाचल्यास उद्योगसमूहातील नकारात्मक व्यवस्थापक सकारात्मक होऊ शकतात.
– माधव किल्लेदार