मानवी जीवनात मन आणि बुद्धीला अनन्य महत्त्व आहे. मन आणि बुद्धी नाही असा कोणीही मनुष्यप्राणी या पृथ्वीतलावर असणे शक्मय नाही. आपल्या मनात विचार येतात. एका संपूर्ण दिवसात असंख्यवेळा आपण आपल्या मनातील विचारांशीच खेळत असतो. त्यात काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि माया या षड्रिपुंनी आपण ग्रासलेले असतो. समर्थांनी मन आणि बुद्धीचा योग्य संगम दासबोधाद्वारे आपल्याला दिला आहे.
आपले मन हे नेहमीच चंचल असते ते सतत या ना त्या कारणाने कुठेतरी पळत असते. पण बुद्धी मात्र स्थिर असते. मनाला चांगल्या-वाईटातला फरक कळेलच असे नाही पण बुद्धीला मात्र चांगले आणि वाईट हे कळतेच. आपल्याला दिलेल्या बुद्धीचा वापर आपण संपूर्ण आयुष्यात किती करतो हे सांगणे किंवा ठरवणे अवघड आहे. पण मनाला कितीही आळा घालण्याचा प्रयत्न केला तरीही मन मात्र आपल्यावर अधिराज्य गाजवतेच.
लहान मुलांना चिमणी आणि कावळय़ाची गोष्ट सांगण्यात येते. त्यात चिमणीचे घर मेणाचे होते आणि कावळय़ाचे घर शेणाचे होते हे सांगितले जाते. कावळा म्हणजे मन ज्याचे घर पावसात वाहून जाते पण चिमणीचे मेणाचे घर पावसात वाहत नाही कारण चिमणी म्हणजेच बुद्धी! समर्थांनी मनुष्य जीवनातील हाच मनाचा खेळ ओळखून आपला बौद्धिक विकास कसा होईल? आपण अधिकाधिक प्रगल्भ कसे होऊ याकरिताच ग्रंथराज दासबोध ही देणगी मानवजातीला दिली आहे.
व्यवस्थापन शास्त्रातसुद्धा बुद्धी आणि मनाला खूप महत्त्व आहे. व्यवस्थित असणे आणि अव्यवस्थित असणे म्हणजे नेमके काय, तर व्यवस्थित असणे म्हणजेच योग्य व्यवस्थापन आणि अव्यवस्थित असणे म्हणजेच अयोग्य, कमकुवत व्यवस्थापन म्हणजेच मिस मॅनेजमेंट. योग्य व्यवस्थापनात मनाला बुद्धीला ताब्यात दिलेले असते तर अयोग्य व्यवस्थापनात बुद्धीही मनाच्या ताब्यात असते. मानवी जीवनात प्रश्न, अडचणी, त्रास, कष्ट आणि दु:ख आहे. ज्ञानाचा-विज्ञानाचा प्रसार-प्रचार होऊनही मानवी जीवन सुखी नाही. कारण आपल्यातील विवेक हरवला आहे. समर्थ 13 व्या दशकातील उभारणी निरुपण समासात म्हणतात की,
पृथ्वी वल्ली नाना रंग । पत्रे पुष्पांचे तरंग ।
नाना स्वाद ते मग । फळे जाली ।।
पत्रे पुष्पे फळे मुळें । नाना वर्ण नाना रसाळे ।
नाना धान्ये अन्ने केवळे । तेथून जाली ।।
अन्नापासून जोलें रेत । रेतापासून प्राणी निपजत ।
ऐसी हे रोकडी प्रचित । उत्पत्तीची ।।13/3/11-12-13।।
याचा अर्थ पृथ्वीच्या उदरातून अनेक प्रकारचे वृक्ष, वेली, पाने, फुले आणि फळे निर्माण झाली. अनेक रंगांची व रसांनी युक्त पाने, फुले, फळे, मुळे हे सारे एका अंकुरापासून निर्माण झाले. अन्नापासून वीर्याची उत्पत्ती होते आणि त्यातून प्राणी जन्माला येतात हा जीवाच्या उत्पत्तीचा प्रत्यक्ष अनुभव.
व्यवस्थापनाच्या दृष्टीने या ओव्यांचा विचार करायचा झाल्यास सुरुवातीला एका विचाराचा उगम होतो. त्यानंतर त्या विचारावर एक बौद्धिक प्रक्रिया केली जाते. मग बुद्धीच्या कसोटीवर हाच एक विचार अनेक वेळा तपासला जातो. त्यातून त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम बघितले जातात.
भूत, भविष्य आणि वर्तमानकालीन परिस्थितीचा आढावा घेतला जातो. त्याचे अचूक आणि नीट आकलन केले जाते. त्यानंतरच समाजात हा विचार रुजवला जातो. त्यावर होणाऱया उलटसुलट प्रतिक्रियांचा अभ्यास केला जातो. मग हळूहळू त्या विचाराला पाठबळ देणारे वातावरण आपोआप तयार होते. काही समर्थक त्या विचाराचे पाईक होतात तर काही विरोधकांची फळी निर्माण होते. या सर्व अंतर्गत आणि बाहय़ संघर्षातूनच हा विचार जगन्मान्य होतो. पण या सर्व प्रवासाचे मूळ त्या एका विचारातच दडलेले असते.
आजकालच्या काळात ज्याला आपण ‘ब्रँड मेकिंग’ असे म्हणतो. तो ब्रँडसुद्धा अशाचप्रकारे निर्मिला जातो. कुठलाही उद्योगसमूह हा अशाचप्रकारे भरारी घेत असतो. मग तो उद्योगसमूह आपल्या देशातील असो वा परदेशातील असो. जे उद्योगसमूह आज जगभरात नावारूपाला आलेले आहेत त्यांच्या मुळाशी असलेला एक भरभक्कम विचारच होय! त्या विचाराशी प्रामाणिक असलेला वर्ग म्हणजेच तेथील उत्तम व्यवस्थापन होय. तर त्या विचाराला झालेला विरोध म्हणजेच त्या उद्योगसमूहातील अव्यवस्थितपणा होय. म्हणजेच मिसमॅनेजमेंट होय. जे उद्योगसमूह अतिउच्च स्थानापर्यंत जातात किंवा पोहोचतात त्यांच्या संस्थापकांनी मनाला बुद्धीच्या ताब्यात देऊनच विवेकाने मार्गाक्रमण केलेले असते. प्रचंड
मानसिक आणि बौद्धिक कष्ट घेतलेले असतात. ते कुठेही विचलित न होता समोर आलेल्या प्रत्येक परिस्थितीचा यथायोग्य विचार करूनच पुढे पावले टाकत असतात.
असे उद्योगसमूह ‘शॉर्ट टर्म गोल’ ऐवजी ‘लाँग टर्म गोल’ चा विचार करतात. समाजातील आर्थिक, राजकीय, आणि सांस्कृतिक परिस्थितीचा आपल्या उद्योगावर होणारा भूत, भविष्य आणि वर्तमानातील परिणामाचा सातत्याने विचार केला जातो. सुदैवाने असे काही उद्योगसमूह औद्योगिक क्षेत्र आणि यशस्वी उद्योजक आपल्या भारतात आहेत, ज्यांच्या चरित्रातून किंवा आत्मचरित्रातून आपल्याला त्यांचा अथपासून इतिपर्यंतचा प्रवास कळू शकतो. आपल्या देशातील अनेक तरुण उद्योजक आज अशा संपन्न दिशेने वाटचाल करत आहेत. त्यांना जर खऱया अर्थाने औद्योगिक विश्वात संपन्न आणि कीर्तीवंत व्हायचे असेल तर समर्थांच्या दासबोधाद्वारे योग्य व्यवस्थापन शिकणे आवश्यक आहे.
माधव किल्लेदार