नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जीएसटी त्रुटी, ई-वे बिलातील जाचक अटी यासह इंधन दरवाढीचा निषेध नोंदवण्यासाठी अखिल भारतीय व्यापारी महासंघाने म्हणजे ‘कॅट’ने पुकारलेल्या देशव्यापी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. मुंबई शहर, उपनगरांसह संपूर्ण महानगर क्षेत्रातील सुमारे साडेतीन लाख व्यापारी, दुकानदार यात सहभागी झाले होते. ‘कॅट’ने या बंदची घोषणा केल्यानंतर व्यापारी, वाहतूकदार आणि कर व्यावसायिकांनीही त्याला पाठिंबा दर्शवला होता.
शुक्रवारच्या देशव्यापी बंददरम्यान होलसेल आणि किरकोळ बाजारांमधील व्यवहार थंडावले होते. मात्र, अत्यावश्यक वस्तू विक्रीच्या दुकानांना या बंदमधून वगळण्यात आल्याने सर्वसामान्य ग्राहकांना त्याचा फटका बसला नाही. मात्र, वाहतूक आणि व्यवहार खोळंबल्याने व्यापारी पेठा ठप्प झाल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून येत होते. बेंगळूरसह देशाच्या काही भागात चक्काजाम आंदोलन छेडून बंदला बळ देण्यात आले. देशभरातील जवळपास 8 कोटी व्यापाऱयांचे प्रतिनिधित्व करणाऱया जवळपास 40 हजार व्यापारी संघटनांनी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया टेडर्सच्या (सीएआयटी) ‘भारत बंद’ला पाठिंबा दिला होता. भारत बंददरम्यान अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय, दूध आणि भाजी-पाल्यांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यात आला होता.