प्रतिनिधी/ सातारा
जिल्हय़ात कोरोना बाधितांचे आकडे दिवसेंदिवस वाढू लागल्याने शेवटी राज्यभर जारी करण्यात आलेला लॉकडाऊन जिल्हय़ात राबवण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी शेखर सिंह यांनी दिले. मात्र, मराठीत असून देखील नेमके काय सुरु राहणार व काय नाही याबाबत व्यापाऱयांसह नागरिकांचा देखील गोंधळ उडाला होता. त्यामुळे मंगळवारी सातारा शहरात किराणा, मिठाई, बेकरी, मेडिकल ही दुकाने सुरु राहिली मात्र कापड, सराफी दुकाने बंद ठेवायची असल्याने व्यापाऱयांनी या लॉकडाऊन निर्णयाचा रस्त्यावर उतरुन विरोध केला. त्याला सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील पाठिंबा दर्शवत हा प्रकार म्हणजे राज्य सरकारची मोगलाई असल्याची टीका केलीय.
मंगळवारचा लॉकडाऊनचा पहिला दिवस होता. आदेशात अत्यावश्यक सेवा सोडल्यास इतर बाबी बंद राहतील असेच म्हटले आहे. त्यामुळे किराणा, मेडिकल, मिठाई, पेट्रोल पंप, दवाखाने, हॉस्पिटल्स सोडल्यास इतर व्यवसाय बंद ठेवण्याचा हा आदेश होता. मात्र, तोच नीट कळला नाही असे सांगत साताऱयातील काही दुकाने अर्धवट अवस्थेत उघडी होती. मात्र, लॉकडाऊनमुळे सातारकरांची रस्त्यावरील वर्दळ कमी झाली होती. ऐन कडक उन्हात आता सर्वांनाच घरात बसून राहण्याची वेळ आली आहे.
या बाबीला मात्र साताऱयातील व्यापाऱयांनी रस्त्यावर उतरुन संचारबंदी व जमावबंदीचा आदेश मोडीत काढत विरोध केला. ब्रेक द चेन नावाने जो आदेश महाराष्ट्र शासनाने काढला आहे तो या राज्यातील छोटे-मोठे व्यापारी वर्गावर अन्याय करणारा आहे. आधी येत असलेल्या बातम्यामधून असे वाटत होते की आठवडय़ात दोन दिवस संपूर्ण व्यापार बंद ठेवायचा आहे. परंतु प्रत्यक्षात आदेश हा संपूर्ण एक महिना बंद ठेवायचा असल्याने या लॉकडाऊनला विरोध असल्याचे व्यापाऱयांचे म्हणणे होते.
व्यापारी अडचणीत आणणारा लॉकडाऊन
आजच्या परिस्थितीत व्यापारी वर्गाला हे परवडणारे नाही. कारण मागील पूर्ण वर्ष या कोविड मुळे व्यापारी प्रचंड अडचणींना तोंड देत कसेतरी आपला संसार चालवण्याचा प्रयत्न करीत आहे. आता पुन्हा एक महिनाभर दुकाने बंद ठेवली तर जगणेही अवघड होणार आहे. कारण कामगारांचे पगार, बॅंकेचे व्याज व हाफ्ते, लाईट बील, जागा भाडे इत्यादी खर्च सुरुच राहणार आहेत. त्यामुळे आपण कोणीही दुकाने बंद ठेवण परवडणार नाहीत. आपला व्यवसाय सुरू ठेऊनच आपण आपले व आपल्या कामगारांचे संसार चालवू शकतो ही जबाबदारी पार पाडूया अशी व्यापाऱयांची भूमिका प्रशासनाला संघटनेने कळवली आहे.
दुकाने बंद जनता रस्त्यावर
लॉकडाऊनच्या निर्णयामुळे सातारा शहर परिसरातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने व सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचा आदेश असल्याने विरोध असला तरी बंद ठेवण्यात आली होती. मात्र, सातारकर नेहमीप्रमाणे रस्त्यावर आलेलेच होते. दुकाने बंद अन सातारकरांची गर्दी रस्त्यावर असा प्रकार सुरुच होता. सकाळी 7 ते रात्री 8 अत्यावश्यक सेवाच सुरुच राहणार आहेत. तिथे देखील नियम पाळूनच खरेदी करायाची असली तरी सातारकर मात्र भर उन्हात रस्त्यावर रेंगाळतच होते.
हॉटेल, स्नॅक्सवाल्यांकडून फक्त पार्सल सेवा
हॉटेल, रस्त्यावरील वडापाव व इतर खाद्यपदार्थ विक्री ही फक्त पार्सल सेवा द्यायची असल्याने शहरातील काही हॉटेल्स सुरु होती. मात्र, त्यांना ग्राहकांना आत घेता येत नव्हते. त्यामुळे काही ग्राहक पार्सल घेवून जात होते तर काही आम्हाला आत बसून खावूद्या असे म्हणत होते. मात्र दंडाच्या भीतीने हॉटेल, स्नॅक सेंटर, वडापाव विक्रेते फक्त पार्सल नेण्याचा आग्रह करताना दिसून येत होते. याचा परिणाम खानवळ चालवणाऱयांवर देखील त्यांना ग्राहकांना सेवा देताना अडचणी निर्माण झाल्या आहेत.
नाभिक संघटनेचा जेलभरो आंदोलनाचा इशारा
लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद झाल्यास नाभिक समाजातील लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. आम्ही दुकाने बंद ठेवण्यास तयार आहोत. मात्र, शासनाने प्रत्येक नाभिक कारागिरास प्रति महिना 15 ते 20 रुपये द्यावेत. वयाचा निकष न लावता सर्व नाभिक कारागिरांना लस देण्याचे आदेश द्यावेत याबाबत शासनाने चार दिवसात निर्णय न घेतल्यास 12 एप्रिलपासून आम्ही दुकाने सुरु करणार असून प्रशासनाकडून त्रास झाल्यास राज्यभर जेलभरो आंदोलन करण्याचा महाराष्ट्र इशारा स्वाभिमानी नाभिक संघटनेचे अध्यक्ष शंकरराव गायकवाड यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदनही संघटनेने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिले आहे.
सातारा पालिकेची धडक कारवाई
सातारा पालिकेच्या पथकाने अंशतः लॉकडाउन जाहीर असताना मोती चौक ते 501 पाटी या दरम्यान दुकाने सुरू ठेवणाया सात दुकान मालकांना दंड केला. पालिकेचे अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम आणि त्यांच्या पथकाने दुपारी दोन वाजेपर्यंत 14 हजार रुपयांचा दंड वसूल केला. सदाशिव पेठेतील मोटार स्टँन्डच्या मंडई परिसरातील भाजीच्या दुकानांसह किरकोळ विक्रेत्यांची दुकाने सुध्दा सर्रास सुरू होती . सातायात प्रमुख वर्दळीच्या रस्त्यावरचा व्यापार सक्तीने बंद असला तरी सेवा रस्ते व इतर गल्लीबोळातील दुकानदारांनी दुकानाचे शटर अर्धवट खाली ओढून आपला व्यवसाय सुरूच ठेवला होता.