पालकमंत्री उदय सामंत यांची कुडाळ येथे ग्वाही
व्यापारी एकता मेळावा दुसरे सत्र
प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे मांडणार!
ताकद मोठी पण कोणाला झेंडा लावायला देऊ नका!
प्रतिनिधी / कुडाळ:
व्यापाऱयांचा आमदार म्हणून मीच तुमचा प्रतिनिधी म्हणून काम करेन. तुमचे प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे मांडून यापूर्वी झालेल्या भेटीचे व चर्चेचे रुपांतर बैठकीत होऊन व्यापाऱयांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आपण प्रयत्न करेन, अशी ग्वाही सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी येथे दिले.
व्यापाऱयांची ताकद मोठी आहे. मात्र, कोणाला झेंडा लावायला देऊ नका. तुमच्यातील ताकद तुम्ही ओळखा, वाढवा. भविष्यात पुढारी तुमच्याकडे आले पाहिजेत, असे काम करा, असे त्यांनी सांगितले.
येथील सांस्कृतिक भवन येथे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघातर्फे आयोजित व्यापारी एकता मेळाव्याच्या दुसऱया सत्रात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन तायशेटे, चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, सारस्वत बँकेचे संचालक सुनील सौदागर, कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली, कुडाळ तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष संजय भोगटे, प्रमोद ओरोसकर, संदेश पारकर, संजय पडते, छोटू पारकर, पोलीस निरीक्षक शंकर कोरे उपस्थित होते.
सामंत म्हणाले, सिंधुदुर्गला अशा पेहरावातील पालकमंत्र्यांची सवय नसेल. मी व्यापाऱयांमधील एक आहे, म्हणून असा आलो आहे. विधानपरिषदेत व्यापाऱयांना प्रतिनिधीत्व असावे, अशी व्यापाऱयांची मागणी आहे. भविष्यात होईलही, पण आता मीच तुमचा आमदार म्हणून तुमचे प्रतिनिधीत्व करतो. व्यापारी व कामगारांचे प्रश्न येतात, तेव्हा सकारात्मक चर्चा झाली पाहिजे, असे ते म्हणाले.
शटर बंद करण्याचा प्रयत्न नको!
चेंबर्स ऑफ कॉमर्सने यापुढे कोणत्याही बंदमध्ये व्यापारी सहभागी होणार नाही, असा निर्णय चेंबर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी घेतल्याचे सांगितले, या निर्णयाचे सामंत यांनी स्वागत केले. व्यापारी संघटनेने समाधानकारक निर्णय घेतला, असे त्यांनी सांगत कुठेही, काहीही घडले की, राग व्यापाऱयांवर काढला जातो. शटर बंद झाली की, बंद यशस्वी केल्याचे सांगत नेत्यांसमोर मिरविले जाते. या निर्णयामुळे सिंधुदुर्गातील लोकांची सुटका झाल्याचे ते म्हणाले. ‘नाही तर बंद करा’, असे आवाहन करायचे आणि नाही बंद केले, तर हा सिंधुदुर्ग आहे, असे सांगितले जायचे. मीही सिंधुदुर्गातीलच आहे. आता शटर बंद करण्याचा प्रयत्न करू नका, असा इशाराही सामंत यांनी दिला. व्यापाऱयांच्या प्रश्नांसाठी त्यांची वकिली आपण मुख्यमंत्र्यांकडे यशस्वीपणे करू, अशी ग्वाही देत तुमचे प्रश्न वर्षभरात सोडवेन, असे सांगितले.
बंदमध्ये व्यापारी सहभागी होणार नाहीत-मंडले
यापुढे कोणत्याही राजकीय तसेच अन्य बंदमध्ये व्यापारी सहभागी होणार नाहीत. दुकाने, व्यवसाय बंद ठेवला जाणार नाही, असा निर्णय महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने राज्यातील सर्व महासंघांच्या बैठकीत घेतला आहे, असे महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी सांगितले. व्यापाऱयांचे कोणताही राजकीय पक्ष व अन्य कोणाशी वैर नाही. कुठेतरी, काहीतरी होते आणि नंतर बंदची घोषणा केली जाते. काहीजण स्वत: भीतीने बंद करतात, तर काही ठिकाणी जबरस्तीने दुकाने बंद केली जातात. त्यामुळे व्यापाऱयांचे नुकसान होते. कोणीही बंद पुकारला, तर बंद ठेवू नका, असे आवाहन त्यांनी केले. मात्र, बंदच्या दिवशी दिवसभर व्यापारी काळय़ा फिती लावून बंदला समर्थन देतील. राष्ट्रीय संपत्ती वाचविण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे ते म्हणाले. कै. एकनाथ ठाकुर तसेच आशिष पेडणेकर हे दोन अध्यक्ष सिंधुदुर्गने दिले, याची आठवण मंडलेचा यांनी करून दिली.
मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा!
वाढते सेल, मोठय़ा प्रँचाईसी, ऑनलाईन खरेदी अशा विरुद्ध व्यापारी महासंघाचा संघर्ष आहे, असे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. व्यापाऱयाला त्रास होता नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर आमच्या समवेत होते. या सर्वांच्या सहकार्यातून प्रश्न सोडविण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली, असे ते म्हणाले.
विविध व्यापारी पुरस्कार प्रदान
‘महिला उद्योजकता पुरस्कार’ प्रभावती महादेव वाळके (कडावल), तर लक्ष्मीबाई वैकुंठ घुर्ये स्मृती ज्येष्ठ महिला व्यापारी पुरस्कार एलिझा फर्नांडिस (कुडाळ) यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आदर्श ग्रामीण व्यापारी संघटना पुरस्कार ओरोस व्यापारी यांना, तर तालुका पुरस्कार सावंतवाडी तालुक्याला देण्यात आला. लोकमान्य सोसायटीचे विभागीय चेअरमन आनंद सामंत यांचाही सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून अवधूत शिरसाट यांना सन्मानित करण्यात आले.
पुढच्या वर्षी सावंतवाडीत मेळावा
पालकमंत्री उदय सामंत यांचा सत्कार करण्यात आला. पुढच्या वर्षी व्यापारी मेळावा सावंतवाडी तालुक्यात घेण्यात येणार असून यजमानपद सावंतवाडीकडे असेल, असे तायशेटे यांनी जाहीर केले.
एमएच-07 वाहनांना टोल माफी द्या
व्यापाऱयांचे अनेक प्रश्न मांडताना मुंबई-गोवा महामार्गावर टोलनाका येत असून कणकवलीतील व्यापाऱयांना ओरोस जिल्हा मुख्यालयात यायचे झाले, तर भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे एमएच-07 च्या पासिंग वाहनांना टोलमाफी द्यावी, अशी मागणी तायशेटे यांनी केली. पर्यटन जिल्हय़ाचे फायदे वीज व अन्य सुविधांसाठी द्यावे. जीएसटी स्लॅब बदलू नये, प्लास्टिक बंदीला पाठिंबा, पण पर्यायी उत्पादन द्या. मॉलला परवानगी देताना लोकसंख्या निकष पाळावेत, याकडे लक्ष वेधले.