परिसराला अस्वच्छतेचे ग्रहण : शीतपेय-हॉटेलचालकांनी दक्षता घेण्याची गरज
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेकडून बेळगाव स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी वेगवेगळय़ा प्रकारे जनजागृती सुरू आहे. पण सध्या नागरिकांकडून नाही तर व्यावसायिकांकडूनच ठिकठिकाणी कचरा टाकण्यात येत आहे. नागरिक घरातील ओला व सुका कचरा महापालिकेच्या घंटागाडीकडे सुपूर्द करतात. मात्र, हॉटेल आणि शीतपेय गृहातील कचरा पालापाचोळा रस्त्याकडेला टाकण्यात येत असल्याने परिसराला अस्वच्छतेचे ग्रहण लागले आहे.
कोर्ट परिसर आवारातील जिल्हा पंचायत कार्यालयाजवळील इंद्रायणी कॉलनीनजीक शीतपेय गृहामधील (कोल्ड्रिंक हाऊस) फळांची साले, प्लास्टिक टाकण्यात आल्यामुळे येथील परिसर अस्वच्छ बनला आहे. शनिवार खूटनजीक कुजलेल्या भाज्यांचा पालापाचोळा टाकण्यात आल्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
त्यामुळे हॉटेलधारकांनी आणि इतर व्यक्तींनी आपल्या हॉटेलमधील कचरा कचराकुंडीत टाकावा अथवा घंटागाडीकडे सुपूर्द करावा. जेणेकरून आपलाच परिसर स्वच्छ आणि सुंदर होईल, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.