पंकज पाटील यांची मागणी : बेळगावात बैठक
वार्ताहर /कोगनोळी
येथील राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरण होत आहे. यासाठी शासनाकडून टोलनाका परिसरात शेतजमीन जाणाऱया शेतकऱयांना गुंठय़ाला 5 लाख 44 हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पण या ठिकाणी अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी लाखो रुपयांचे कर्ज घेऊन उद्योग-व्यवसायांची उभारणी केली आहे. या व्यावसायिकांना व या ठिकाणी काम करणाऱया कामगारांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी जि. पं. माजी उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी केली.
बेळगाव येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयात अधिकारी व व्यावसायिक यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे व्यवस्थापक एस. एम. नाईक यांनी टोलनाका परिसरात असणाऱया शेतकऱयांची शेतजमीन, शेतामध्ये असणाऱया विहिरी, पाईपलाईन, कूपनलिका, झाडे अशी वेगवेगळे नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. या ठिकाणी असणाऱया व्यावसायिकांनाही नुकसानभरपाई देण्यासाठी या व्यावसायिकांचा सर्व्हे करण्यात आला आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये जि. पं. माजी उपाध्यक्ष पंकज पाटील यांना घेऊन सर्व्हे करून नुकसानभरपाई देण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.