प्रमागच्या सदरात ‘नारी तू नारायणी’ लेखामार्फत आपल्या समाजातील स्त्रियांची कालानुरूप झालेली विटंबना, त्यांची उपेक्षा आणि वर्तमानकाळात त्याचे उमटत असलेले पडसाद यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. पण बदललेल्या किंवा सकारात्मक दृष्टीकोन ठेवून बदलू प्रयत्नात असलेल्या समाजात जरी स्त्री – पुरुष समानतेचा बोलबाला चालू असला तरीही खऱया अर्थाने काही गोष्टी समान असूच शकत नाहीत. किंबहुना निसर्गानेच ती तरतूद करून ठेवलीये. पुरुषाला निसर्गाने बलदंड शरीरयष्टी, व्यवहारचातुर्य आणि कमकुवत भावनिक इच्छाशक्ती प्रदान केली आहे. स्त्रीला तुलनेत कमी शारीरिक बळ, सांसारिक चातुर्य आणि जबरदस्त प्रबळ भावनिक इच्छाशक्ती प्रदान केलेली आहे .
मुळातच स्त्री आणि पुरुष हे संसाररूपी रथाचे दोन अश्व आहेत. ज्यांना एकमेकांच्या शक्तींना आणि कमतरताना सावरून घेत पुढे जायचे असते. पण या रथाच्या गतीवर वचक राहण्यासाठी थोडे सांसारिक चातुर्य आणि थोडे व्यावहारिक चातुर्य दोहोंची समान प्रमाणात गरज असते. आपल्याकडे बऱयापैकी कुटुंबात दैनंदिन निर्णय घरच्या कर्त्यापुरुषाच्या होकारानेच पुढे जातात. अगदी स्वयंपाकातल्या बनणाऱया भाजीपासून ते बँक व्यवहारापर्यंत. पण जेव्हा प्रश्न येतो लग्नाचा, बरेचसे वर – वधू पिता एक पाऊल पाठी असल्याचे निदर्शनास येते . 90 टक्के केसीस मध्ये वर -वधू माताच या संशोधनाच्या कार्यात पुढाकार घेत असल्याचे दिसून येते. हा पुढाकार सकारात्मक असल्यास बरीचशी रखडलेली लग्ने चुटकीसरशी होतील. पण दुर्दैवाने वर-वधू मायचा नको तितका पुढाकार, व्यावहारचातुर्याचा अभाव, भूत किंवा भविष्यकाळाला धरून बसून वर्तमान काळाला कानाडोळा करणे यासारख्या अनेक ढोबळ गोष्टींमुळे वधू -वरांची लग्नाची वय वाढताहेत.
एक दिवस प्रदीपची आई ऑफिसमध्ये आली. प्रदीप तसा 40 शी ओलांडलेला. बेंगलोरला चांगल्या कंपनीत मोठय़ा हुद्यावर, बक्कळ पगाराच्या नोकरीत होता. सर्व सुख सोयींयुक्त असे 3 खोल्यांचे घरही त्याने तिकडे घेतले होते. त्याच्या घरचेही सगळे शैक्षणिक, आर्थिक दृष्टया सबळ, आधुनिक विचारसरणीचे आहेत असं त्याच्या आईचं म्हणणं होतं. त्यामुळे आम्हाला आमच्या प्रदीपला आमच्या कुटुंबाला साजेशी अशी शिकलेली, मॉडर्न मुलगी हवी आणि त्यांच्या मते मॉडर्न आणि शिकलेली म्हणजे जिला फाडफाड इंग्रजी बोलता येईल, तीचं तर असं म्हणणं होतं की तुमच्या संस्थेच्या फॉर्ममध्ये किंवा वेबसाईटवर त्या मुलींना स्वतःबद्दल इंग्रजीमध्ये लिहायला सांगा म्हणजे त्यांची शैक्षणिक पात्रता मला कळेल. कारण इंग्रजी माध्यमातील मुलगी असेल तरच मी पुढे जाईन. बाकीच्या माध्यमातील मुली मला अजिबात चालणार नाहीत. जसं की त्या मुलीचं लग्न या सासूबाईंबरोबरच होणार आहे.
एखाद्या मुलीची शैक्षणिक आणि वैचारिक बुद्धिमत्ता तिच्या इंग्रजीवर ठरवणाऱया या बाईंची खरंच मला खूप कीव आली. एखाद्या माणसाचे कर्तृत्व आणि क्षमता त्याच्या कामावरून न करता त्याची किंमत त्याच्या भाषेवरून करणे ही किती खालच्या दर्जाची संकल्पना आहे . आज मुलगा 40 शी गाठलेला आहे आणि ह्या बाई अजूनही भाषेचा पोरखेळ करत अनेक अनुरूप मुलींना नाकारत होत्या. आणि दुर्दैवाने या सगळय़ात वर पिता किंवा प्रत्यक्ष स्वतः वर यांची फक्त बघ्याची भूमिका होती.
बिचारा प्रदीप आतापर्यंत आईने पसंत केलेल्या अगदी निवडकच मुलींना भेटला होता. पण त्या भेटीचाही काही उपयोग झाला नाही कारण फाडफाड इंग्रजी बोलणाऱया, अति मॉडर्न मुलींनी त्याला सरळ सरळ त्याच्या आई -वडिलांची तुलना घरातील डस्टबिन (कचरापेटी) म्हणून केली होती. स्वतःला उच्चभ्रू समजून सदैव मोठेपणाच्या काल्पनिक जगात वावरणाऱया प्रदीपच्या आई सारख्या असंख्य आई आपल्या अवतीभोवती आपल्याला दिसतील. ज्यांना अगदी नकळतपणे आपल्या मुलासाठी अनुरुप सह जीवनसाथी मिळण्यापेक्षा त्यांच्या ढोबळ मानमरातबीला सजून दिसणारी एक नैसर्गिक बाहुली हवी असते.
बरं वधू माउली ही या स्पर्धेत काही पाठी नाहीये. बऱयाचशा उपवर तरुणींच्या लग्नाला विलंब होण्यामागचं एक मुख्य कारण म्हणजे वधू माउलीचे नको तितके पॅक्टीकल विचार. आम्ही जे लग्नानंतर सोसलं ते माझ्या मुलीच्या बाबतीत व्हायला नको या एका भीतीपोटी कित्येक वधू-माता वरांचे पॅकेज आणि स्वातंत्र्य या गोष्टीपाठी आहेत. लग्नासाठी स्थळासंदर्भात फोन केला असता तो फोन चुकून जरी वडिलांनी उचलला तर त्यांचा सूर असतो ‘थांबा हां… आमची हीच सर्व बघते. देतो तिच्याकडे’ मग काय वधू माउली मुलाचं नाव, गाव, इतर माहिती विचारायच्या आधीच मुलाचं पॅकेज किती ? तो लग्नानंतर कोठे राहणार ? मुलाचे आई -वडील गावाकडेच राहतील ना ? अशा अनेक भौतिकवादी प्रश्नांची उधळण चालू करते.
अर्थात काही अपवादही आहेत जिथे वधू -वरांच्या माता फक्त शैक्षणिक दृष्टय़ाच नव्हे तर वैचारिक, भावनिक आणि व्यावहारिक दृष्टय़ा प्रगल्भ आहेत आणि अर्थातच त्यामुळे त्यांच्या पाल्याचे लग्न विना तक्रार, विना विलंब पार पडत.
पण आज खऱया अर्थाने गरज आहे वर-वधू पित्यानेही आपल्या व्यावहारिक चातुर्याचा उपयोग करत येणाऱया प्रत्येक स्थळाकडे स्वतःहून पुढाकार घेऊन बोलणे. येणाऱया प्रत्येक स्थळाशी आपल्या मुलाचं -मुलीचं कितपत पटेल, त्या मुलाची -मुलीची जीवनशैली कितपत आपल्या पाल्याशी, आपल्या कुटुंबाशी मिळते -जुळते. कितपत आपल्या मुलीला तिचा करियरच्या दृष्टीने त्या कुटुंबात वाव मिळेल किंवा कितपत ती मुलगी आपल्या घराची सून म्हणून आपल्या परिवाराच्या संस्कारात रुळू शकेल. आर्थिक गोष्टी बाजूला सारल्या तर कितपत हे वधू-वर लग्नानंतर सुखी संसार करू शकतील या सारख्या वास्तविक बाबींचा विचार होणे गरजेचे आहे आणि एका वैज्ञानिक अहवालानुसार वास्तववादी विचारांचा अवलंब आणि कृती बायकांच्यापेक्षा पुरुष जास्त चांगल्या प्रकारे करू शकतात. त्यामुळे वर- वधू पित्यांनो आपल्या पाल्याचे विवाह लवकरात लवकर अनुरूप स्थळाशी करायचे असल्यास आपण या संशोधन कार्यात खारीचा नाही तर सिंहाचा वाटा उचलणे आज गरजेचे होत चालले आहे यावर विचार जरूर करावा.
डॉ. स्नेहल अवधूत सुखठणकर