वृत्तसंस्था/मॅके
यजमान ऑस्ट्रेलिया आणि भारत महिला क्रिकेट संघामध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळविली जात असून ऑस्ट्रेलियाने पहिले सलग दोन सामने जिंकून मालिका हस्तगत केली आहे. रविवारी येथे होणाऱया तिसऱया आणि शेवटच्या वनडे सामन्यात भारतीय महिला संघ ‘व्हाईटवॉश’ टाळण्यासाठी प्रयत्न करेल तर यजमान संघ ही मालिका एकतर्फी जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.
अलीकडील कालावधीत ऑस्ट्रेलियन महिला संघाने दर्जेदार कामगिरीचे सातत्याने दर्शन घडविताना सलग 26 वनडे सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे. या मालिकेतील झालेल्या दुसऱया सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या डावातील गोस्वामीने टाकलेला शेवटचा चेंडू पंचांनी नोबॉल ठरविल्याने भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. या दुसऱया सामन्यामध्ये भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी समाधानकारक झाली होती. भारताने या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 275 धावांचे आव्हान दिले होते आणि ऑस्ट्रेलियाने शेवटच्या चेंडूवर आपला विजय नोंदविला.
रविवारच्या तिसऱया आणि शेवटच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांवर अधिक दडपण राहील. भारतीय संघातील फिरकी गोलंदाज पूनम यादव आणि दीप्ती शर्मा यांचा प्रभाव अद्याप दिसून आलेला नाही. भारताने ही मालिका एकतर्फी गमावली तर गेल्या काही दिवसामध्ये झालेल्या वनडे क्रिकेट प्रकारात भारताने 11 पैकी 9 सामने गमावण्याची नोंद होईल. उपकर्णधार हरमनप्रित कौरला फलंदाजीचा सूर मिळणे जरूरीचे आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 5.35 वाजता सुरू होईल.