अचूक बातमी “तरुण भारत”ची, गुरूवार, 16 सप्टेंबर 2021, सकाळी 10.15
● लक्षणे दिसल्यावरही चाचणी न करणारांमुळे चिंता
● गृहविलिगिरणातील रूग्णांच्या नातेवाईकांचाही बेफिकिरपणा
● रूग्णवाढ वाढू न देण्यासाठी प्रशासनाकडून सक्ती गरजेची
● स्थानिक प्रशासनाने पुन्हा लक्ष देण्याची गरज
● गत 24 तासात 252 रूग्ण वाढले
● 11 हजार 955 संंशयितांच्या चाचण्या
● 2.11 पॉझिटिव्हीटी रेट
सातारा / प्रतिनिधी :
सप्टेंबर महिन्यातील पंधरवड्यात केवळ दोन दिवसांचा अपवाद वगळता कोरोना रूग्णवाढ आटोक्यात आली आहे. सातारा, फलटण, खटाव, कराडसह इतर तालुक्यातही रूग्णवाढीचा वेग कमी झाला आहे. मात्र सध्या जिल्ह्यात वातावरणात सातत्याने बदल होत असून कधी मुसळधार पाऊस कोसळतोय तर लग्गेच ऊन पडतेय. वातावरणातील या बदलाने लहान मुलांसह नागरिकांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र किरकोळ आजार वगळता ज्यांना सर्दी,खोकला, ताप अशी सर्व तीव्र लक्षणे आहेत असे अनेक लोक कोरोना चाचणी टाळत असल्याची चर्चा आहे. ‘व्हायरल’ आहे काय होतेय त्याला हा आत्मविश्वास घात करू शकतो. अशा अनेकांमुळे न कळत कोरोना रूग्णवाढ पुन्हा उसळी घेण्याची भिती व्यक्त होत आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक ग्रामपंचायती, आरोग्य केंद्रे, नगरपरिषदा यांनी पुन्हा एकदा नियमांची काटेकोर अमलबजावणी करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. दरम्यान गुरूवारी आलेल्या अहवालात 252 नवे रूग्ण वाढले आहेत. गेल्या 24 तासात चाचण्यांचे प्रमाण पुन्हा एकदा 10 हजारांच्या पुुढे गेले असून 11 हजार 955 संंशयितांच्या चाचण्या झाल्या आहेत.
चाचण्यांचे प्रमाण दुप्पटीने घटले
गणरायाच्या आगमनाचा उत्साह सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात दुसरी लाट ओसरायला सुरूवात झाली. कोरोना चाचण्यांचे प्रमाण ऑगस्टपर्यंत आणि सप्टेंबर महिन्यातील चार दिवस 10 हजारांच्या पुढेच होते. मात्र अलिकडच्या काही दिवसात कोरोना चाचण्यांचे प्रमाण घटले असून 9 ते 7 हजारांच्या आसपास आले आहे. रूग्णवाढ घटली हे दिलासादायक असले तरी संशयितांच्या चाचण्यांचे प्रमाण कायम ठेवणे काळाची गरज आहे.
आरोग्यमंत्र्यांचा इशारा गांभिर्याने घ्यायला हवा
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकतेच तिसरी लाट कधी येऊ शकते? यावर वक्तव्य केले आहे. आक्टोंबर महिन्याच्या शेवटी रूग्णसंख्या वाढू शकते असा अंदाज तज्ञांनी वर्तवल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आरोग्यमंत्र्यांचे हे वक्तव्य जिल्हा प्रशासनासह जिल्हावासियांनी गांभिर्याने घेण्याची गरज आहे. रूग्णवाढीचे आकडे घटले म्हणून मास्क गळ्यात आले, आकडे घटले म्हणून गळ्यातले मास्क खिशात गेले यासह बेफिकीरपणामुळे जिल्हा पुन्हा धोक्याच्या उंबरठ्यावर जाऊ नये याची काळजी प्रत्येकाने घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
जिल्हय़ात बुधवारी
एकूण बाधित – 252
एकूण मुक्त – 64
एकूण बळी – 03
जिल्हय़ात बुधवारपर्यंत
एकूण नमूने -1944,831
एकूण बाधित -245,482
घरी सोडलेले -234,179
मृत्यू -6,022
उपचारार्थ रूग्ण-8,231