नवी दिल्ली / वृत्तसंस्था
व्हिएतनाम हा भारताचा इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण भागीदार असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. दोन्ही देशांमधील सहकार्यामुळे या क्षेत्रातील शांतता व स्थिरता कायम राहण्यास हातभार लागेल, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. व्हिएतनामचे पंतप्रधान नुग्वेन झुआन फ्युक यांच्याशी झालेल्या व्हर्च्युअल शिखर बैठकीत ते बोलत होते. व्हिएतनामशी असलेले आपले संबंध दीर्घकालीन आणि सामरिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याची स्पष्टोक्तीही त्यांनी दिली.
व्हिएतनाम हा भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. गेल्या काही वर्षांमध्ये दोन्ही देशांमधील व्यापक रणनीतिक भागिदारीची व्याप्ती लक्षणीय प्रमाणात विस्तारली आहे. इंडो-पॅसिफिक प्रदेशात शांतता, स्थिरता आणि समृद्धी हे आमचे ध्येय आहे. या प्रदेशात शांतता आणि स्थिरता राखण्यात भारतही महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. जगभरात सर्वत्र कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असताना व्हिएतनामनेही कोरोनाशी दिलेली झुंज कौतुकास्पद असल्याचे मोदी म्हणाले.
2016 मध्ये भारत आणि व्हिएतनामने आपल्या संबंधांना व्यापक रणनीतिक भागिदारीत प्रोत्साहित केल्यापासून जलदगतीने विस्तारणाऱया द्विपक्षीय संबंधांमधील संरक्षण सहकार्य सर्वात महत्त्वपूर्ण पातळीवर पोहोचले आहे.