नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी भारत सरकारने घातलेली व्हिसावरील बंदी हटवली आहे. इलेक्ट्रॉनिक आणि पर्यटन वगळता सर्वांना प्रवासासाठी व्हिसा निर्बंध शिथिल केल्याने विदेशी प्रवासाचा मार्ग सुकर झाला आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे सरकारने ठरविले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती दिली. दरम्यान, विदेशात जाऊ इच्छिणाऱया किंवा विदेशातून भारतात येणाऱया प्रवाशांना कोरोनासंबंधीच्या सर्व मार्गदर्शक सूचना पाळण्याचे बंधन असणार आहे.
भारत सरकार पर्यटक वगळता सर्व ओसीआय, पीआयओ कार्डधारक आणि इतर परदेशी नागरिकांना व्हिसावर कोणत्याही हेतूने भारतात येण्याची परवानगी देत आहे. ते अधिकृतपणे चेक पोस्टद्वारे हवाई किंवा जलमार्गाद्वारे देशात प्रवेश करू शकतात, असे गृह मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. व्हिसाची वैधता कालबाह्य झाली असेल तर त्यांना भारतीय मिशन/पोस्टमधून योग्य श्रेणीचे नवीन व्हिसा मिळू शकतात. संबंधित व्यक्ती त्यासाठी अर्ज करू शकतात, असेही केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
परदेशातून येणाऱया लोकांना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या क्वारंटाईन आणि कोविड-19च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल. वैद्यकीय उपचारांसाठी भारतात येण्यास इच्छुक असलेले परदेशी नागरिक वैद्यकीय अटेंडंटसमवेत (देखभालकर्ता) वैद्यकीय व्हिसासाठी अर्ज करू शकतात. या निर्णयामुळे व्यवसाय, कॉन्फरन्स, नोकरी, अभ्यास, संशोधन आणि वैद्यकीय उपचारांसाठी परदेशी नागरिक भारतात येऊ शकतात.
आठ महिन्यांपासून व्हिसावर होते निर्बंध
आंतरराष्ट्रीय विमानसेवा अद्याप पूर्ववत झालेली नसली तरीही कमर्शिअल फ्लाईट्स, वंदे भारत अंतर्गत देशात येणारी विमाने आणि एअर बबलद्वारे सुरू केलेली सेवा यांच्याद्वारे प्रवासी येऊ शकतात. कोविड-19 च्या साथीच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने फेब्रुवारी 2020 पासून येणाऱया आणि जाणाऱया आंतरराष्ट्रीय प्रवाशांना थांबविले होते. आता अनलॉक-5 अंतर्गत बऱयाच गोष्टी सुरू झालेल्या असताना केंद्र सरकारने आता व्हिसावरील निर्बंध शिथिल केले आहेत.