प्रतिनिधी / बेळगाव
राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत असताना दुसरीकडे विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ (व्हीटीयू) कडून परीक्षा घेतल्या जात आहेत. सोमवारी राज्य सरकारने पुढील 14 दिवस नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय जाहीर करूनही सायंकाळपर्यंत व्हीटीयूने परीक्षा पुढे ढकलण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याने विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराबद्दल अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) ने सोमवारी व्हीटीयूच्या प्रवेशद्वारावर रास्ता रोको आंदोलन केले.
राज्यातील इतर विद्यापीठांनी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असतानाही व्हीटीयूकडून मात्र परीक्षांचा धडाका सुरूच आहे. सोमवारपासून या परीक्षांना सुरुवात झाली. मंगळवारीही एक पेपर घेतला जाणार आहे. एकीकडे राज्य सरकार निर्बंध घालत असताना दुसरीकडे परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना जीव धोक्मयात घालून परीक्षा केंद्रांवर यावे लागत आहे. विद्यार्थी व प्राध्यापकांना परीक्षेदरम्यान कोरोनाचा संसर्ग झाल्यास याची जबाबदारी विद्यापीठ घेणार आहे का? असा सवालही कार्यकर्त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला केला आहे.
सोमवारी सायंकाळी अभाविपचे काही पदाधिकारी कुलगुरूंच्या भेटीसाठी गेले होते. परंतु कुलगुरूंनी कार्यकर्त्यांची भेट नाकारली. त्यांना प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले. यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन केले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.