उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात नोंदवल्या आपल्या प्रतिक्रिया
प्रतिनिधी /बेळगाव
शहरवासियांचे लक्ष वेधून घेतलेल्या महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. ज्यांची जनतेमध्ये उजळ प्रतिमा आहे, ज्यांनी समाजासाठी कार्य केले आहे, त्यांना स्वीकारावा लागलेला पराभव हा खेदजनक आहे. निवडणूक म्हटले की जिंकणे-हरणे आलेच. परंतु त्या सर्व प्रक्रियेत पारदर्शकता असली तर वास्तवाचा स्वीकार सहजपणे करता येतो. या पार्श्वभूमीवर लागलेला निकाल धक्कादायक असून त्याबाबत उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
निवडणुकीचा निकाल धक्कादायकच
महानगरपालिकेच्या निवडणुकीचा लागलेला निकाल हा धक्कादायकच आहे. वॉर्ड पुनर्रचना करण्यात आल्याने प्रभागांमध्ये फोडाफोड करण्यात आली. तसेच मतदारयाद्यांमधील अनेक नावेही दुसऱया प्रभागांमध्ये जोडण्यात आली होती. या सर्वांचा एकंदर परिणाम म्हणजे निवडणुकीत मराठी भाषिकांना पराभव स्वीकारावा लागला.
-ऍड. रतन मासेकर-माजी नगरसेवक
महापालिकेचा निकाल संशयास्पद
महानगरपालिकेचा लागलेला निकाल पाहिल्यास तो संशयास्पद दिसत आहे. मतदानावेळी व्हीव्हीपॅटचा वापर केला गेला नसल्याने या संशयात वाढ झाली आहे. राज्य सरकारने घाईगडबडीत मतदारयादीत घोळ करत निवडणुका घेतल्या. हा निकाल आम्हाला अमान्य असून, याविरोधात कायदेशीर लढा देऊ, असा इशारा शुभम शेळके यांनी दिला आहे.
-शुभम शेळके-अध्यक्ष म. ए. युवा समिती
बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा
मतदानाचा टक्का या खेपेस घसरला असला तरी मराठी भाषिक वॉर्डांमध्ये उत्साहाने मतदान झाले होते. परंतु निकाल मात्र अनपेक्षित लागले आहेत. एव्हीएम मशीनमधील घोटाळय़ामुळेच हा धक्कादायक निकाल लागला आहे. त्यामुळे हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर मतदान घेऊन दाखवा, असा इशारा किरण गावडे यांनी दिला आहे.
-किरण गावडे-सरचिटणीस शहर म. ए. समिती
वॉर्ड पुनर्रचनेचा मराठी भाषिकांना फटका
अवैज्ञानिक पद्धतीने बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वॉर्डांची पुनर्रचना करण्यात आली. एक गल्ली दोन प्रभागांमध्ये विभागली गेली. काही ठिकाणी तर एकाच घरातील मते दोन भिन्न प्रभागांमध्ये होती. केवळ म. ए. समितीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मॅनेज केलेली ही निवडणूक होती, असा घणाघात दीपक दळवी यांनी केला.
दीपक दळवी-अध्यक्ष शहर म. ए. समिती
प्रभागातील अनेक मते गहाळ
वॉर्ड पुनर्रचना करताना ती चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे त्याचा फटका मराठी भाषिकांना निवडणुकीत बसला. यामुळेच माझ्या प्रभागातील 300 हून अधिक मते गहाळ झाली. अनेकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. ईव्हीएम मशीनला व्हीव्हीपॅट नसल्याने आम्ही आक्षेपही घेतला होता. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे माजी महापौर महेश नाईक यांनी सांगितले.
महेश नाईक-माजी महापौर
निवडणुकीपूर्वी गाफील राहिल्याचा फटका
निवडणुकीपूर्वी आम्ही गाफिल राहिल्याचा फटका निकालामधून दिसला. ईव्हीएमला व्हीव्हीपॅट असेल अशीच धारणा करून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. याचाच फटका आम्हाला निकालावेळी बसला. वॉर्ड पुनर्रचनेमुळे एकाच घरातील मतांची दोन ते तीन वॉर्डांमध्ये विभागणी करण्यात आली. यामुळे मतांची विभागणी होऊन मराठी भाषिकांना हार पत्करावी लागली.
-प्रकाश मरगाळे-शहर म. ए. समिती
हा तर लोकशाहीवरच घाला
निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीनला व्हीव्हीपॅट लावणे आवश्यक आहे. आपण कोणाला मतदान करतो याची माहिती मतदाराला यामुळे समजते. परंतु बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत ईव्हीएमला व्हीव्हीपॅट लावण्यात न आल्याने ही निवडणूक सदोष झालेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेवरच घाला घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने ही निवडणूक प्रक्रियाच रद्द करावी, अशी मागणी आम्ही निवडणूक आयोगाकडे करणार आहे.
पंढरी परब-माजी नगरसेवक
निकाल अनपेक्षित
निवडणुकीत लागलेला निकाल हा अनपेक्षित आहे. व्हीव्हीपॅट नसल्याने मतदारांचा संशय वाढला आहे. मतदारयादीतील घोळदेखील पराभवास कारणीभूत ठरला आहे. त्यामुळे यापुढील काळात या गोष्टींवर अधिक भर देऊ, असे शिवाजी सुंठकर यांनी सांगितले.
-शिवाजी सुंठकर-माजी महापौर
निवडणुकीत पारदर्शकतेचा अभाव
नियमानुसार ईव्हीएमला व्हीव्हीपॅट बसविणे गरजेचे होते. परंतु व्हीव्हीपॅट नसल्याने निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी एकत्रित येवून राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे याची तक्रार केल्यास यापुढील काळात होणाऱया जिल्हा पंचायत, तालुका पंचायत निवडणुकांवेळी मराठी भाषिकांना फटका बसणार नाही, असे ऍड. महेश बिर्जे यांनी सांगितले.
-ऍड. महेश बिर्जे
माझ्या आई, बहीण व सूचकांची मते गेली कुठे?
मतदान करूनही माझी आई, बहीण व सूचकांची मते गेली कुठे? असा प्रश्न प्रभाग क्र. 4 मधील उमेदवार संजय किल्लेकर यांनी व्यक्त केला आहे. आई, बहीण, भाऊ, पत्नी शिवाय माझे सूचक अशी आठ मते ज्या मतदान केंद्रावर करण्यात आली तेथील ईव्हीएम मशीनमध्ये त्याची नोंदच झाली नाही. त्यामुळे या निवडणूक प्रक्रियेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
-संजय किल्लेकर
निवडणुकीवर प्रश्नचिन्ह
निवडणूक प्रक्रियेसाठी अत्यंत कमी दिवस मिळाल्याने ईव्हीएमला व्हीव्हीपॅट बसविले जाणार की नाही, हे पाहण्याकडे दुर्लक्ष झाले. यामुळे मतदारांचा संशय बळावला आहे. कोणतीही निवडणूक घेताना व्हीव्हीपॅटची सक्ती आहे. परंतु महानगरपालिकेच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट नसल्याने पारदर्शकता राहिलेली नाही. त्यामुळे निवडणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
-ऍड. अमर येळ्ळूरकर
मतदारयादीचा बसला फटका
वॉर्ड पुनर्रचनेमुळे मतदारयादीत मोठा बदल झाला. नवीन मतदार जोडले गेल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास उशीर झाला. व्हीव्हीपॅट असते तर नागरिकांचा मतदान प्रक्रियेवर विश्वास बसला असता. परंतु व्हीव्हीपॅट नसल्याने या संपूर्ण प्रक्रियेवरच अविश्वास निर्माण झाला आहे.
-सुधा भातकांडे-माजी नगरसेविका