व्हॅक्सिन डेपोचे कामकाज जैसे थे ठेवण्याचा आदेश : पुढील सुनावणी 13 ऑगस्टला : ऍड. किरण कुलकर्णी, ऍड. सतीश बिरादार यांची माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
व्हॅक्सिन डेपोमधील वनस्पती, वेगवेगळय़ा प्रकारच्या झाडांची कत्तल राजरोसपणे सुरू होती. व्हॅक्सिन डेपो हा केवळ टिळकवाडीलाच नाही तर बेळगावलासुद्धा ऑक्सिजन देणारा नैसर्गिक स्रोत आहे. असे असताना तेथील नैसर्गिक रूप बदलून विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे व्हॅक्सिन डेपो बचाव समितीच्यावतीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्या ठिकाणी न्यायालयाने या सर्व विकासकामांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे आम्हाला दिलासा मिळाला असून व्हॅक्सिन डेपोचे नैसर्गिक रूप आम्ही कायम ठेवू, असे ऍड. किरण कुलकर्णी आणि ऍड. सतीश बिरादार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
व्हॅक्सिन डेपोमध्ये जवळपास 700 हून अधिक औषधी वनस्पती आहेत. याचबरोबर 385 च्या आसपास इतर वेगवेगळी झाडे आहेत. याचे नुकसान करून विकास कोणालाच नको आहे. यापूर्वी 2006 मध्ये त्या ठिकाणी विधानसौध बांधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तेथील झाडे तसेच इतर वनस्पती पाहून तो रद्द करण्यात आला. टिळकवाडी येथील रस्ते लहान असल्यामुळे ते शक्मय नाही म्हणून विधानसौध इतरत्र बांधण्यात आली. त्यानंतर बोटनिकल गार्डन म्हणून हा सर्व व्हॅक्सिन डेपो राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. 6 जुलै 2006 रोजी बैठक झाली होती.
व्हॅक्सिन डेपोमध्ये हर्बल प्लॅन्ट्स वाढविण्यासाठी 26 नोव्हेंबर 2016 रोजी तत्कालीन मंत्री रमेश कुमार, रोशन बेग, तत्कालीन जिल्हाधिकारी शालिनी रजनीश यांनी याबाबत आयडीसीएलच्या माध्यमातून एक आराखडा तयार केला. मात्र त्यानंतर 2018 साली बेळगावचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्यात आला. त्यावेळी व्हॅक्सिन डेपो तसेच किल्ला तलाव व इतर ठिकाणाचा विकास करण्याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळेच बेळगावचा 16 वा क्रमांक लागला आणि स्मार्ट सिटी करण्याचे जाहीर झाले, असे ऍड. किरण कुलकर्णी यांनी सांगितले.
व्हॅक्सिन डेपो बचाव समितीच्या माध्यमातून लढा
व्हॅक्सिन डेपोचे बोटनिकल गार्डन म्हणून राखीव ठेवण्याचे स्मार्ट सिटीच्या आराखडय़ामध्ये दाखविण्यात आले. मात्र प्रत्यक्षात आता त्या ठिकाणी झाडांची कत्तल करत एमपी थिएटर्स, इव्हेशन गार्डन, बोटिंग, ग्रामीण भारत, व्हिलेज गॅलरी अशा प्रकारे नावे ठेवून त्याचे नैसर्गिक स्वरूपच नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी 38.5 कोटी रुपये निधी मंजूर झाला. त्या निधीतून कामाला सुरुवात झाली. पण यामुळे बेळगावला मिळणारा ऑक्सिजन बंद होणार असल्याने आम्ही व्हॅक्सिन डेपो बचाव समितीच्या माध्यमातून हा लढा लढण्याचे ठरविले, अशी माहिती ऍड. सतीश बिरादार यांनी दिली.
जिल्हाधिकारी तसेच इतरांना आम्ही निवेदने दिली. मात्र, त्यांनी काहीच केले नाही. आता न्यायालयीन लढाई लढण्याचे ठरवून याचिकाकर्ते राजकुमार टोपण्णावर, किशोरसिंग ठाकुर, प्रशांत पंडित, अनुप जाधव, भरत पाटील, वरुण कारखानीस, सचिन तळवार, विनायक केसरकर, जोशी अश्वथपूर, कौस्तुभ कुलकर्णी, एम. प्रज्वल यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.
उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अभय श्रीनिवास ओक आणि न्यायाधीश सूरज गोविंदराज या स्पेशल पीआयएल ग्रीनबेंचसमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायाधीशांनी व्हॅक्सिन डेपोचे कामकाज जैसे थे ठेवण्याचा आदेश दिला आहे. पुढील सुनावणी 13 ऑगस्ट 2021 रोजी होणार आहे. आता न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे आम्ही स्मार्ट सिटी अधिकाऱयांना हे काम थांबविण्यासाठी न्यायालयाची प्रत देणार असल्याचे स्पष्ट केले.
याचिका दाखल करताना राज्य सरकारचे मुख्य सचिव, जिल्हाधिकारी, स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक, बुडा आयुक्त, महापालिका आयुक्त, महसूल विभागाचे मुख्य सचिव, वनविभागाचे मुख्य सचिव, आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याचे मुख्य सचिव, पर्यावरण खात्याचे मुख्य सचिव यांना प्रतिवादी केले होते. आता पुढील सुनावणीवेळी त्यांना आपले म्हणणे मांडावे लागणार आहे. त्यानंतर न्यायालयाचे पुढील कामकाज होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या खटल्यासाठी ऍड. प्राजक्ता कुलकर्णी आणि ऍड. प्रशांत गौडर यांचे सहकार्य लाभले.
व्हॅक्सिन डेपो वाचविण्यासाठी आमचे नेहमीच प्रयत्न !
व्हॅक्सिन डेपोमध्ये सुरू असलेली झाडांची कत्तल पाहून आम्हाला फारच दुःख होत होते. व्हॅक्सिन डेपो वाचविण्यासाठी आम्ही नेहमीच पाठपुरावा करीत आहोत. व्हॅक्सिन डेपोमुळे टिळकवाडी परिसराला ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे याचा बचाव करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने मी संजय चौगुले आणि माझी पत्नी रेणुका चौगुले दोघांनी मिळून वकिलांकडे पाठपुरावा केला असल्याचे त्यांनी सांगितले.