हिंदू जनजागृती समितीचे कुडाळ पोलिसांना निवेदन
वार्ताहर / कुडाळ:
‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी ‘14 फेब्रुवारी’ हा दिवस शाळा-महाविद्यालयात ‘मातृ-पितृ पूजन दिन’ म्हणून साजरा करण्यास प्रोत्साहन देण्यात यावे. तसेच यानिमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पोलिसांची विशेष पथके नियुक्त करावी, महाविद्यालय परिसरात गस्त वाढवावी, वेगाने वाहने चालविणाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने कुडाळ पोलिसांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबत कुडाळ तहसीलदार, गटविकास अधिकारी, शाळा-महाविद्यालयातही निवेदने देण्यात आली. हिंदू जनजागृती समितीचे संजय गावडे, पांडुरंग तेंडोलकर, परशुराम धामनेकर, दैवेश रेडकर, आनंद नाईक आदी यावेळी उपस्थित होते. गेल्या काही वर्षांत ‘14 फेब्रुवारी’ हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्चात्यांची कुप्रथा भारतातही रुढ झाली आहे. पाश्चात्यांनी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या या विकृत संकल्पनेमुळे युवा पिढी भोगवाद आणि अनैतिकता यांच्या गर्तेत ओढली जात आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर प्रेमाचे बीभत्स सादरीकरण करण्याच्या नावाखाली हल्ली एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्ये घडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तसेच यादिवशी होणाऱया मेजवान्यांमधून युवक-युवतींमध्ये मद्यपान, धूम्रपान, अमली पदार्थांचे सेवन आदी अपप्रकारात वाढ झाली आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’मुळे शाळा-महाविद्यालयाच्या परिसरातील कायदा-सुव्यवस्था तसेच शैक्षणिक वातावरण बिघडविणारी स्वैराचारी आणि चंगळवादी वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. महिलांवरील अत्याचारांची भयावह आकडेवारी समोर आहे. अशा प्रकरणांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ‘व्हॅलेंटाइन डे’च्या नावाखाली होणाऱया अपप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांची विशेष पथके नियुक्त करावीत, असे निवेदनात नमूद केले आहे.
तर शाळा-महाविद्यालयांतून देण्यात आलेल्या निवेदनात, अपप्रकारांना आळा घालण्यासाठी काही समाजसेवी संघटना मागील काही वर्षांपासून ‘मातृ-पितृ पूजन दिना’च्या माध्यमातून युवा पिढीसमोर एक आदर्श पर्याय निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सार्वजनिक ठिकाणी आपल्या माता-पित्यांना एकत्र आणून त्यांचे पूजन करणे आणि त्यांच्याविषयी सामूहिकरित्या प्रेम व्यक्त करणे, यासाठी ‘मातृ-पितृ पूजन दिन’ उपक्रमाचे आयोजन करण्यात यावे. शाळेत हा उपक्रम साजरा करण्यासाठी मुख्याध्यापकांनी पुढाकार घ्यावा, असे म्हटले आहे.