हिंदू जनजागृती समितीचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या काही वर्षांमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या नावाखाली जे गैरप्रकार होत आहेत त्याला आळा घालणे काळाची गरज आहे. पाश्चात्य संस्कृती भारतात रूढ होत चालली आहे. त्यामुळे हिंदू संस्कृती लुप्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रेमाच्या नावाखाली विकृत प्रकार युवापिढी करत आहे. हे अत्यंत धोकादायक आहे. एकतर्फी प्रेम करणे, मुलींची छेडछाड करणे, असे प्रकार घडत आहेत. तेव्हा व्हॅलेंटाईन डेवर पूर्णपणे निर्बंध घालावेत, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
व्हॅलेंटाईन डेच्या काळात धर्मांध युवक युवतींना खोटी नावे सांगून फशी पाडत आहेत. त्यामुळे लवजिहादसारख्या घटना घडत आहेत. व्हॅलेंटाईन डेमुळे शाळा, महाविद्यालय परिसरात चंगळवादी वृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याचा ताण पोलिसांवरही पडत आहे. तेव्हा अशा पाश्चात्य संस्कृतीला आळा घालणे गरजेचे आहे. 14 फेब्रुवारीला पोलिसांची विशेष पथके नेमावीत, महाविद्यालय परिसरात ती पथके तैनात करावीत, व्हॅलेंटाईन डे निमित्त होणारे अत्याचार थांबवावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुधीर हेरेकर, रवी कोकितकर, व्यंकटेश शिंदे, मारुती सुतार, अक्काताई सुतार, मीलन पवार, ऋषिकेश गुर्जर, उज्ज्वला गावडे, रुपा लोहार, संतोष जाधव, विनायक हंगरगेकर आदी उपस्थित होते.